लोणी काळभोर, ता. 14: पुणे-सोलापूर महामार्गावरून अवजड व अवैध प्रवासी वाहतूक दिवसाढवळ्या सुसाट सुरू आहे. त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून सामान्य दुचाकीस्वारांनाच लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. मागील चार दिवसांपासून लोणी काळभोर परिसरात वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या या “दंड मोहिमेने” कष्टकरी, शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

लोणी स्टेशन चौक व थेऊर फाटा येथे बुधवार (ता. 11) ते शनिवार (ता. 14) या कालावधीत वाहतूक पोलिसांचे घोळके रस्त्यातच उभे राहत असून दुचाकी गाड्या आडवताना दिसत आहेत. यामुळे एकीकडे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना हजारो रुपयांच्या दंडाला सामोरे जावे लागत आहे. सकाळी कामावर निघालेले कर्मचारी, शेतमाल घेऊन जाणारे शेतकरी आणि कॉलेजला जाणारे विद्यार्थी तासन्तास अडकून पडत असल्याचे चित्र रोजचे झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, याच मार्गावरून नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणारी अवजड वाहने, ओव्हरलोड ट्रक व खासगी बस मात्र निर्धास्तपणे धावत आहेत. “मोठ्यांना मोकळीक आणि छोट्यांवर कारवाई” असा दुहेरी न्याय का, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अपघाताला आमंत्रण देणाऱ्या या अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करून फक्त हेल्मेट, कागदपत्रे किंवा किरकोळ कारणांवर सर्वसामान्यांकडून दंड वसूल केला जात असल्याचा आरोप होत आहे.
वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहतूक पोलीस रस्त्यातच वाहने अडवून स्वतःच कोंडी वाढवत आहेत. यामुळे रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि अत्यावश्यक सेवांनाही अडथळे येत आहेत. “वाहतूक शिस्तीच्या नावाखाली दंडाची लूट सुरू आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, पुणे शहर वाहतूक पोलीस प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून अवैध व अवजड वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, तसेच सामान्य नागरिकांना वेठीस धरणारी ही दंड मोहिम थांबवावी, अशी जोरदार मागणी होत आहे. या सगळ्या प्रकारामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात “पोलीस म्हणजे संरक्षण की दंड वसुली यंत्रणा?” असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जीव धोक्यात घालणारी अवैध प्रवासी वाहतूक!
रिक्षा व सहा-सीटर वाहनांतून सर्रास धोकादायक प्रवासी वाहतूक सुरू आहे. नियमांनुसार रिक्षामध्ये केवळ 3 प्रवासी बसवण्याची परवानगी असताना, प्रत्यक्षात तब्बल 8 ते 10 प्रवासी कोंबले जात आहेत. सहा-सीटर वाहनांमध्ये तर 11 ते 12 प्रवासी भरून वाहतूक केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हडपसर ते वरवंड दरम्यान खुलेआम अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. या अवैध वाहतुकीकडे पोलीस प्रशासनाकडून डोळेझाक केली जाते; मात्र सामान्य दुचाकीस्वारांना अडवून दंड वसुली केला जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.







