पुणे: पुणे (Pune News) शहरातील नवले पूल आणि आसपासच्या परिसरात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांची मालिका आता थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागातील रस्ते अपघातात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नवले पुलावर आता एलिव्हेटेड ब्रिज म्हणजेच उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या एका विशेष बैठकीत हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील याबाबत वेळोवेळी प्रश्न मांडले होते.
दरम्यान, गांभीर्य लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी तात्काळ प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून लवकरच या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल असे आश्वासन यावेळी दिले.
या नवीन उड्डाणपुलामुळे वारजे, नऱ्हे, आंबेगावसह हजारो प्रवाशांचा प्रवास आता सुकर होणार आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासोबतच बाजूच्या सेवा रस्त्यांवरील अडथळे आणि अतिक्रमणे तातडीने काढून रस्ता मोकळा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, भविष्यात मृत्यूचा सापळा बनलेल्या नवले पुलावर आता एलिव्हेटेड ब्रिज उभारल्यानंतर प्रवासही सुखकर होणार आहे.





