पुणे: पुण्यात (Pune News) सध्या लहरी हवामानामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि धुके वाढल्यामुळे कांद्यासह इतर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पुरंदर तालुक्यातील परिंचे, वीर, माहूर, तोंडल, हरणी, यादववाडीसह हरगुडे, पिंपळे आणि पांगारे यांसारख्या गावातील कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

धुके आणि थंडीच्या तडाख्यामुळे कांद्याच्या रोपांवर करपा आणि मर रोगाचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. रोगामुळे कांद्याच्या पातीवर पांढरे डाग पडू लागले आहेत. ज्वारी आणि इतर पालेभाज्या या पिकांवरही हवामान बदलाचा नकारात्मक परिणाम झाला आहे.
निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फिरले आहे. कांदा पिकाव्यतिरिक्त टोमॅटो, मिरची, हरभरा यांसारख्या पिकांवरही रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वैतागले आहेत. लागवडीसाठी केलेला मोठा खर्च भरून न निघाल्यास शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.
काही दिवसांपासून थंडी कमी होऊन उष्मा वाढल्यामुळे पिकांवर रोगांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, येत्या काळात बदलत्या हवामानामुळे पिकाला मोठा फटका बसण्याची भीती आहे, ज्याचा थेट परिणाम शेतीवर होणार आहे.







