पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुण्यात मोठा राजकीय धक्का बसण्याची चिन्हे आहेत. माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. बेलदरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपली नाराजी जाहीर केली असून, यामुळे अजित पवार गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

या वादाचे मुख्य कारण प्रभाग क्रमांक 38 (बालाजी नगर-आंबेगाव-कात्रज) मधील जागांचे समीकरण मानले जात आहे. या प्रभागात माजी महापौर दत्ता धनकवडे, युवराज बेलदरे आणि प्रकाश कदम असे तीन दिग्गज नेते एकाच पक्षातून इच्छुक आहेत. मात्र, नव्या प्रभाग रचनेनुसार येथे पुरुष उमेदवारांसाठी जागा मर्यादित झाल्या आहेत. या तिघांपैकी कोणा एकाचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने युवराज बेलदरे यांनी बंड करणार असल्याचे चिन्हे आहेत.
बेलदरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, त्यांचे अजित पवार यांच्यावर वैयक्तिक प्रेम आहे आणि ते त्यांचे केवळ कार्यकर्ते नव्हते, तरीही आज त्यांना कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. ‘मला आणि माझ्या आंबेगावला कमी लेखणाऱ्यांना आता वेळ उत्तर देईल’, अशा शब्दांत त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीतही अजित पवार यांच्याच एका कार्यकर्त्याने, निलेश इंगुले यांनी अपक्ष लढून विजय मिळवला होता. आता पुण्यातही तोच ‘बारामती पॅटर्न’ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पुण्यातील या राजकीय भूकंपामुळे महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अधिकच वाढण्याची शक्यता आहे. युवराज बेलदरे यांनी जर अपक्ष किंवा इतर पक्षातून निवडणूक लढवली, तर त्याचा थेट फटका अजित पवार गटाला बसू शकतो.







