उरुळी कांचन, ता. 26 : पुणे-सोलापूर महामार्गावर लांबच लांब रांगा लागत असल्याने महामार्ग 24 तास हाऊसफुल्ल होऊन धावतोय. पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने या मार्गावरील हडपसर ते यवत या दरम्यान सहा पदरी उन्नत मार्गांबरोबरच अस्तित्वातील रस्ता सहा पदरी करण्यात येणार आहे. ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर या रस्त्याची कामे होणार असून, त्यासाठी 5 हजार 262.36 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या संबंधीचा शासननिर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिवांनी नुकताच काढला.

यामुळे भविष्यात पुणे-सोलापूर महामार्गासह पुणे-नगर, पुणे-सातारा, हडपसर-सासवड या चारही दिशेने वाहणारे महामार्ग सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरेल…या भावनेने महामार्गालगतच्या जमिनींना सोन्याचे दर आले आहेत. विकणारा वाटेल तो दर सांगतोय आणि घेणारा त्या दराने घेत असल्याची उदाहरणे सध्या पहायला मिळत आहेत. त्यातच पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या 3 हजार एकर जमिनीसाठी 6 हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या चारही मार्गांच्या शेजारील जमिनींना सोन्याचे दिवस आले आहेत.
सध्या पूर्व हवेलीतील हडपसर, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, व उरुळी कांचनपासून यवत पर्यत एकच समस्या भेडसावते, ती म्हणजे वाहतूक कोंडीची, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे जीवनमान कोंडीत अडकले आहे. सर्वाधिक फटका पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व हडपसर शहराला बसत असून वाहनधारक अक्षरशः कॉलनी भागातून रस्ते शोधत बाहेर पडण्याचा प्रयत्न करताहेत. अशात मात्र काही गुंतवणूकदार भविष्याची आशा म्हणून या कोंडीकडे पाहत आहेत.
मुळात पुणे-सोलापूर या महामार्गावरून चार ते पाच राज्यांची मोठी वाहतूक सुरू असते. परिणामी महामार्गाच्या कडेला हॉटेल, धाबे, पेट्रोल पंप व इतर व्यवसाय वाढू लागले आहेत. भविष्यात ही वाढ आणखी वेगाने असेल हे हेरून लगतच्या जमिनी खेरदी केल्या जात आहेत. वर्षापासून वाहतुकीत दुप्पट वाढ झाल्याने भविष्यात याला विशेष महत्त्व येणार असल्याने जमीन खरेदीच्या शोधात असणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
पुणे-सोलापूर या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने 5 हजार कोटीचा निधी नियोजित केल्याचे सांगितले जाते. त्यातच शहरात रिंगरोड मंजूर असून या शक्यतेने देखील भांडवलदारांकडून आत्ताच जमिनीकडे अधिकच ओढा वाढला आहे. तसेच कदमवाकवस्ती येथे एका बड्या नामांकित बांधकाम व्यावसायिकाने येथील औद्योगिक वसाहत कार्यान्वित होऊ शकते हा विचार करून महामार्गाच्या कडेच्या जमिनीला सोन्याचे दर आले आहेत. तसेच मोठी गृहसोसायट्यांची निर्मिती युध्द पातळीवर सुरु आहे.
दरम्यान, महामार्गाचे रुंदीकरण प्रस्तावित असून त्यादरम्यान शहराच्या वाहतूक कोंडीवर कायमचा पर्याय शोधण्यासाठी रिंगरोड करण्याची मागणी होत आहे. रिंगरोड मंजूर असून काही ठिकाणी कामे सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शहराच्या चारही बाजूने अनेक जमिनी अधिग्रहीत होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. त्यामुळे या भागात जमिनी घेण्यालाही गुंतवणूकदार प्राधान्य देताना दिसत आहे.
उद्योग-व्यावसायिकांकडून मागणी
जमिनींना मागणी वाढू लागल्याने अक्षरशः सोन्याचे दर मिळू लागले आहेत. व्यापारी, गुंतवणूकदार आणि उद्योगसमूहांचा वाढता कल लक्षात घेता भोवतीचा पट्टा नव्या व्यावसायिक नकाशावर झळकू लागल्याचे चित्र आहे. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन व परिसरात महामार्गालगत पेट्रोलपंप, ट्रान्सपोर्ट कार्यालये, गोदामे, लॉजिस्टिक पार्क, ढाबे, हॉटेल्स तसेच लहान- मोठ्या उद्योगांसाठी जागेची मागणी झपाट्याने वाढत आहे.
पूर्व हवेलीत होणाऱ्या रिंगरोडमुळे दळणवळणाची सुविधा हि सोपी होईल, पुण्याचे अंतर सहजासहजी कमी होऊन लगेच जाता येणार आहे. टाऊनशिप व रहिवास यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी व उद्योग धंद्यासाठी या ठिकाणी आकर्षित होतील. रेल्वे, पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, भविष्याकाळात सर्वात जास्त नागरी वसाहत म्हणून या भागाला होईल. त्यामुळे परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव येणार आहे. रिंगरोडमुळे वेगवेगळे झोन पडणार असून यामुळे जमिनींना सोन्याचे दिवस आले आहेत.
– संतोष कांचन, माजी सरपंच, उरुळी कांचन, ता. हवेली
पूर्व हवेलीत जमिनींसाठी मागणी इतकी झपाट्याने वाढली आहे की, जवळजवळ ‘सोन्याचे दर’ लागू होऊ लागले आहेत. उरुळी कांचन रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ यामुळे व्यापारी, गुंतवणूकदार आणि उद्योगसमूहांचा कल पाहता, भोवतीचा पट्टा आता नव्या व्यावसायिक नकाशावर चमकू लागला आहे. ट्रान्सपोर्ट कार्यालये, गोदामे, लॉजिस्टिक पार्क, ढाबे, हॉटेल्स तसेच लहान-मोठ्या उद्योगांसाठी जागेची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे परिसरात व्यावसायिक क्रांतीची लाट सुरू झाली आहे. स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि सेवा क्षेत्राला यामुळे नवसंजीवनी मिळू लागली आहे.
– सागर आबा कांचन / संदीप गव्हाणे, उद्योजक, तथा जानाई डेव्हलपर्सचे संचालक, उरुळी कांचन, ता. हवेली







