पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क-बंडगार्डन परिसरातील वाहतुकीची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या साधू वासवानी पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामावरून प्रशासन आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पुलाच्या कामाला होत असलेल्या प्रचंड विलंबावरून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महापालिकेला थेट आदेश देत संबंधित कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

पुलाचे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दीड वर्ष उलटूनही प्रकल्पाचे ५० टक्के कामही पूर्ण झालेले नाही. तीन प्रमुख खांबांचे काम अजूनही अपूर्ण असल्याने पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या विलंबामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून कोरेगाव पार्क, बंडगार्डन, नॉर्थ मेन रोड आणि साधू वासवानी चौक येथे दररोज प्रचंड कोंडी होत आहे. प्रवासाचा वेळ तिपटीने वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने या विलंबाचे खापर तांत्रिक अडचणी आणि रेल्वे प्रशासनावर फोडले आहे. प्रकल्पाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १००० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे स्थलांतर आणि रेल्वे ट्रॅकजवळील कामामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. रेल्वे विभागाकडून ‘ओपन वेब गर्डर’ डिझाइनमध्ये बदल सुचवण्यात आल्याने मंजुरी प्रक्रियेत जवळपास ९ महिने विलंब झाला.
तसेच, काम सुरू करण्यापूर्वी जलवाहिन्या, वीजवाहिन्या आणि रेल्वे परवान्यांचा समन्वय साधला गेला नसल्याचेही समोर आले आहे. साउथ मेन रोडकडे जाण्यासाठी सहा मीटर रुंदीचा पर्यायी मार्ग देण्याचे आश्वासनही पाळले गेले नाही. याशिवाय, वाहतूक वॉर्डन काढून घेतल्याने वाहतूक पोलिसांवर अतिरिक्त ताण पडला आहे.
अधिकृतरित्या या प्रकल्पासाठी २४ महिन्यांची मुदत असून मे २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र सध्याची संथ गती पाहता हे लक्ष्य गाठणे कठीण असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने जबाबदारी निश्चित करून ठोस कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.







