Pune Crime: लोणी काळभोर, ता. 9 : ‘समर्थ क्रॉप केअर’ कंपनीच्या नावाखाली शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना प्रतिमहिना तब्बल 10 टक्के परताव्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रशांत गवळी याला अखेर पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक केल्यानंतर गवळीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र या घोटाळ्यातील इतर प्रमुख सहकारी अजूनही पोलिसांच्या कारवाईपासून दूर असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याप्रकरणी लक्ष्मी विजय बर्लाल (वय 61, रा. सोमवार पेठ, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार समर्थ क्रॉप केअर कंपनीचा संचालक प्रशांत गवळी व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 336 (2), 336 (3), 340 (2), 316 (5), 3 (5), 61 (2) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीच्या घोटाळ्यात प्रशांत गवळीची पत्नी ज्योती प्रशांत गवळी, नागनाथ धोंडिबा जाधव, पंडित राठोड, दीपक कटारे, चंद्रकांत राऊत, अविष्कार सुरवसे (रा. बिजली नगर, पुणे), तसेच सुदामा दास, मोनीषा सुदामा पाने उर्फ दास, प्रकाश मंगाने (रा. सिंहगड रोड) आणि जोतीबा महादेव काटकर (रा. हडपसर) यांचाही सहभाग असल्याची तक्रारीत नोंद आहे. मात्र या सर्वांविरोधात अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने मुख्य आरोपी अटकेत असताना इतर सहकारी मोकाट कसे, असा सवाल गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशांत गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे, अहिल्यानगर, सोलापूरसह राज्यातील 12 हून अधिक जिल्ह्यांतील 40 ते 45 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांकडून 4 ते 5 हजार कोटी रुपयांची बेकायदा रक्कम गोळा केली असल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा ‘पुणे प्राईम न्यूज’ने केला. गुंतवणूकदारांची मुद्दल अथवा परतावा देणे शक्य न झाल्याने सप्टेंबर 2025 महिन्यात ही संस्था दिवाळखोरीत गेली. त्यानंतर गुंतवणूकदारांना एक दमडीही मिळालेली नाही. गवळी यांच्याकडून पैसे देण्याऐवजी गुंतवणूकदारांना केवळ आश्वासने दिली गेली आहेत.
पुणे प्राईम न्यूजने समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या संशयास्पद व्यवहारांबाबत वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून जनजागृती केली. या बातम्यांमुळे अनेक संभाव्य गुंतवणूकदार सावध झाले आणि मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक फसवणूक टळली आहे. समाजहिताच्या दृष्टीने केलेल्या या पत्रकारितेमुळे अनेकांचे संसार वाचल्याची प्रतिक्रिया गुंतवणूकदारांकडून व्यक्त होत आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून अद्यापही या घोटाळ्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही आणि इतर आरोपींवर देखील कारवाई न केल्यामुळे गुंतवणूकदार गोंधळात सापडले आहेत. तसेच आपले पैसे मिळणार की नाहीत या संभ्रमात अडकले आहेत.
सहआरोपींवर कारवाई कधी?
मुख्य आरोपी अटकेत असताना इतर आरोपींवर कारवाई का होत नाही, असा सवाल गुंतवणूकदार व नागरिकांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सखोल करून सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पत्रकारांना धमक्याही दिल्या
या घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर पुणे प्राईम न्यूजचे संपादक व पत्रकारांना फोन व एसएमएसद्वारे धमक्या दिल्याचेही समोर आले आहे. प्रशांत गवळी व त्याच्या कथित एजंटांकडून बातम्या थांबविण्यासाठी विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. मात्र या धमक्यांना न जुमानता पुणे प्राईम न्यूजने निडर पत्रकारितेची भूमिका कायम ठेवत हा महाघोटाळा राज्यासमोर आणला आहे.
“घोटाळा उघडकीस आणला म्हणूनच पुणे प्राईम न्यूजवर स्वयंघोषित नेत्यांकडून बिनबुडाचे आरोप”
समर्थ क्रॉप केअर या कथित कंपनीचा घोटाळा उघडकीस आणण्यात पुणे प्राईम न्यूजने निर्णायक भूमिका बजावली. घोटाळ्याचा भांडाफोड होत असताना स्वयंघोषित नेत्यांकडून “बातम्या करू नका” म्हणून विविध प्रकारच्या विनंत्या आणि फर्माईशी केल्या जात होत्या. परंतु कोणत्याही दबावाला किंवा अमिषाला बळी न पडता पुणे प्राईम न्यूजने समाजहिताची तटस्थ भूमिका कायम ठेवत हा संपूर्ण घोटाळा जनतेसमोर आणला.
दरम्यान, आता काही संबंधित स्वयंघोषित नेत्यांकडून “पुणे प्राईम न्यूजने पैसे घेतले” असा बिनबुडाचा आरोप केला जात आहे. मात्र याबाबत कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उलट, संबंधित कंपनीच्या एका कथित एजंटने केलेल्या संभाषणाच्या रेकॉर्डिंगमध्ये “पुणे प्राईम न्यूजने कधीही पैसे मागितले नाहीत किंवा घेतले नाहीत” असे बोलल्याचा ऑडिओही व्हायरल झाला होता. पैसे घेतले असते तर या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा झाला नसता आणि घोटाळ्याचा पर्दाफाशही झाला नसता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे विनाकारण बदनामी करण्याऐवजी संबंधितांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज असल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे.







