Pune Crime: पुणे : प्रेमास नकार मिळाल्याचा राग मनात धरून एका तरुणाने थेट रिक्षा आणि दुचाकींना आग (Fire) लावल्याची धक्कादायक घटना पुण्यातील रहाटणी परिसरातील श्रीनगर स्वामी समर्थ कॉलनीत घडली आहे. या आगीत चार दुचाकी आणि एक रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली असून सुमारे 3 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना 29 डिसेंबर रोजी रात्री सव्वादोनच्या सुमारास घडली. Pune Crime News

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भगवान अशोक घनाते यांनी ही तक्रार नोंदवली आहे. भगवान घनाते हे रिक्षा चालक असून त्यांनी आपल्या घरासमोर रिक्षा पार्क केली होती. त्याच ठिकाणी त्यांची दुचाकी तसेच त्यांच्या भावांच्या दुचाकीही उभ्या होत्या. संशयिताने या सर्व वाहनांना आग लावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
CCTV फुटेज तपासणी
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयिताने पेट्रोलचा वापर करून वाहने पेटवताना दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक तपासात प्रेमास नकार दिल्यामुळे तरुणाने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
या घटनेप्रकरणी 22 वर्षीय अभिषेक राजाराम श्रीनामे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संशयिताचा शोध घेतला जात आहे. परिसरात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.







