Mumbai Pune Expressway : मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस (Mumbai Pune Expressway) वेवर झालेल्या भीषण अपघातात (Accident) आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मित्रांसोबत सहलीसाठी गेलेल्या या तरुणांचा प्रवास अचानक दुर्दैवी ठरला.

मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी मुंबईतील सहा मित्र सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले होते. रात्री उशिरा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी पहाटे लोणावळ्यात सूर्योदय पाहण्याचा बेत आखला होता. 18 मार्चच्या पहाटे ते लोणावळ्याकडे जात असताना भातान बोगद्याजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, कार वेगात जात असताना चालकाने समोर असलेल्या कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट कंटेनरच्या मागील भागावर आदळली. धडक इतकी जोरात होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला.
या अपघातात ओम कुमार बोरसे (नाशिक), श्रेयांश शर्मा (जयपूर) आणि लय देशभ्रतार (नागपूर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तातडीने बचावकार्य करण्यात आले आणि सर्वांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.
या दुर्घटनेत आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हे सर्व विद्यार्थी अत्यंत हुशार असून नामांकित संस्थेत शिक्षण घेत होते. एका सहलीचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि सुरक्षित वाहन चालवण्याचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






