बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar Death) अपघाती निधनाने केवळ राज्याच्या राजकारणालाच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबालाही मोठा (Ajit Pawar) धक्का बसला आहे. विशेष म्हणजे हे निधन अशा टप्प्यावर झाले, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका दोन्ही गटांनी एकत्र लढवल्या होत्या, तर आगामी जिल्हा परिषद निवडणुका (Maharashtra Politics) घड्याळ या एकाच चिन्हावर लढवण्यावरही एकमत झाले होते. मात्र आता अजित पवार नसल्याने राष्ट्रवादीच्या भविष्यातील नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)

अजित पवार यांच्या पश्चात पक्षाची धुरा कोण सांभाळणार, यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. पवार कुटुंबातील सदस्य, अजित पवारांसोबत पक्षफुटीत गेलेले सहकारी आणि दोन्ही गटांना मान्य असलेले नेते यांच्याभोवती ही चर्चा फिरत आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव थेट पर्याय म्हणून घेतले जात आहे. बारामतीत महिला गटांच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला, तरी नंतर त्या राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या. मात्र राज्यभरातील संघटनात्मक पकड आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ही त्यांची मर्यादा मानली जाते.
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनाही वारसदार म्हणून पाहिले जाते. 2019 मध्ये त्यांनी मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना अपयश आले. संघटनात्मक अनुभव आणि राज्यव्यापी नेतृत्वाचा अभाव पाहता त्यांच्याकडे तात्काळ जबाबदारी देणे कठीण मानले जाते.
अजित पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचीही नावे चर्चेत आहेत. प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय पातळीवरील अनुभव आहे, मात्र महाराष्ट्रातील जनाधार मर्यादित आहे. तटकरे कोकणापुरते प्रभावी मानले जातात. धनंजय मुंडेंना मराठवाड्यात पाठिंबा असला, तरी मागील वाद त्यांच्या आड येऊ शकतात. छगन भुजबळांकडे अनुभव असला, तरी वय आणि जुने वाद हे अडथळे ठरू शकतात.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससमोर सर्वात मोठा आणि अंतिम पर्याय म्हणजे शरद पवार. दोन्ही गटांना मान्य असलेले, वरिष्ठ नेत्यांशी वैयक्तिक संबंध असलेले आणि सहकार क्षेत्रावर प्रभाव असलेले शरद पवार नेतृत्व किंवा किमान मार्गदर्शक भूमिकेत पुढे येऊ शकतात. मात्र वयामुळे ते थेट सक्रिय राजकारणाऐवजी मार्गदर्शनाची भूमिका स्वीकारतील, अशी शक्यता अधिक आहे.
एकूणच, दोन्ही राष्ट्रवादी गटांचे विलीनीकरण आणि सर्वांना मान्य होईल असे नेतृत्व उभे करणे, हेच सध्या पक्षासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. हे आव्हान कोण पेलतो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







