Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भविष्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी होतील, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं, तर सेक्युलर मतदारांनी त्यावर आश्चर्य व्यक्त करू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही वक्तव्य केली. (sharad pawar)

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही पक्ष विरुद्ध पक्ष नसून ‘गाववाले विरुद्ध बाहेरचे’ अशीच होणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. १९७२ च्या दुष्काळानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित झालेल्या अनेकांनी शहराच्या जडणघडणीत योगदान दिलं, मात्र आजही त्यांना ‘गाववाले’ म्हणून स्वीकारलं जात नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे ही निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेरचे अशीच होईल, असं ते म्हणाले.
या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार हे बारामतीचे असून पिंपरी-चिंचवडचे नाहीत, हे विसरता कामा नये, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
सेक्युलर मतदारांनी सावध राहावं, असा इशारा देत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवार भाजपकडे जाण्यासाठी सध्या पायवाट तयार केली जात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचं संभाव्य विलिनीकरण, अजित पवारांचं भाजपसोबत राहणं आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणं हे चित्र घडलं, तर त्यात आश्चर्य वाटू नये, असंही त्यांनी नमूद केलं. महाविकास आघाडी सोडून शरद पवार सत्तेत सहभागी होतील का, या थेट प्रश्नावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसमधील अनेक स्थानिक नेते फक्त नावापुरते काँग्रेसमध्ये असून त्यांची आत्मा भाजपमध्ये आहे, असा आरोप त्यांनी केला. वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासूनच भाजपसोबत न जाण्याची भूमिका घेतली होती आणि उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यासोबत जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्यांनी ‘नारद मुनीची भूमिका’ घेतल्यामुळे एकत्र येण्याऐवजी आघाडीचे विघटन झालं, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.







