Pune Politics: पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात शिवसेना (ठाकरे) पक्षासमोर मोठे संघटनात्मक संकट उभे राहिले आहे. महापालिका निवडणूक प्रमुख, शहरप्रमुख, महिला संघटिका, माजी नगरसेवक तसेच बाबर कुटुंबातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी साथ सोडल्याने पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. पक्षातील अनेक माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (अजित पवार) पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

हेही वाचा- बाहेर महिला वॉर्डनचा पहारा, आत मुख्याध्यापकाचं काळं कृत्य! कुणी विचार केला नसेल असं भयानक कांड
या घडामोडींचा थेट परिणाम येत्या महापालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी दोन वेळा इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या शिवसेनेवर आता उमेदवार शोधण्याची वेळ आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेचा मोठा आणि हक्काचा मतदार होता. संघटनाही मजबूत होती. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा आमदारही विजयी झाला होता.
2012 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 14 नगरसेवक निवडून आले होते. मात्र 2017 च्या निवडणुकीत ही संख्या घटून 9 वर आली. भोसरी मतदारसंघातून एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नव्हता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, तरीही अनेक निष्ठावान शिवसैनिक ठाकरे गटासोबत टिकून होते.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या संजोग वाघेरे यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी चांगली लढत दिली. मात्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मिळाल्याने शिवसेना (ठाकरे) पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढली.
विधानसभा निवडणुकीनंतर माजी विरोधी पक्षनेत्या आणि भोसरीतून निवडणूक लढवलेल्या सुलभा उबाळे यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहिलेले अनेक पदाधिकारी आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सोडत असल्याने शिवसेना (ठाकरे) पक्षाची पिंपरी-चिंचवडमधील स्थिती अधिकच अडचणीत आली आहे.






