पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरात (Pune Crime) प्रेमास नकार दिल्याच्या कारणातून संतापलेल्या तरुणाने रिक्षा आणि चार दुचाकींना आग लावल्याची धक्कादायक (Pune News) घटना घडली आहे. या आगीत एक रिक्षा आणि चार दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या असून सुमारे 3 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना श्रीनगर भागातील स्वामी समर्थ कॉलनी येथे सोमवारी 29 डिसेंबर रोजी रात्री सव्वादोनच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

या प्रकरणी अभिषेक राजाराम श्रीनामे (वय 22, रा. स्वामी समर्थ कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भगवान अशोक घनाते (वय 53, रा. स्वामी समर्थ कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) यांनी काळेवाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भगवान घनाते हे रिक्षा चालक असून त्यांनी आपली रिक्षा आणि दुचाकी घरासमोर उभी केली होती. तसेच त्यांच्या भावांनीही त्यांच्या दुचाकी याच ठिकाणी पार्क केल्या होत्या. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित अभिषेक श्रीनामे याने या सर्व वाहनांवर पेट्रोल ओतून त्यांना आग लावली.
आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत चार दुचाकी आणि एक रिक्षा पूर्णपणे जळून नष्ट झाल्या होत्या. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला असून संशयित पेट्रोल ओतून वाहने पेटवत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. प्राथमिक तपासात एका तरुणीने प्रेमास नकार दिल्याने अभिषेक श्रीनामे याने संतापातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.







