दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल (Delhi Blast) किल्ल्याजवळ झालेल्या भीषण (Delhi News) स्फोटाच्या तपासात पोलिस आणि फॉरेन्सिक तज्ञांसमोर मोठी माहिती आली आहे. प्राथमिक तपासानुसार, या स्फोटात अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल म्हणजेच ANFO या अत्यंत शक्तिशाली स्फोटकाचा वापर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. तज्ज्ञांच्या मते, हा हाय-एक्स्प्लोसिव्ह ब्लास्ट होता, पण स्फोट “वरच्या दिशेने” झाल्याने जमिनीवर खड्डा पडला नाही. मात्र ज्वलनशील पदार्थांमुळे झालेल्या स्फोटात मोठी जिवीतहानी झाली असून परिसरात एकच गोंधळ उडाला.

सुरुवातीला असा अंदाज वर्तवला जात होता की, हल्लेखोरांनी स्फोटासाठी काही नवीन आणि अत्याधुनिक तंत्र वापरलं आहे. पण आता तपासात उघड झालं आहे की हीच ANFO पद्धत 2012 साली पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये वापरण्यात आली होती. त्या वेळी सहा बॉम्ब ठेवण्यात आले होते, त्यापैकी चार निष्क्रिय राहिले, पण दोन ठिकाणी स्फोट झाले होते. या दोन्ही घटनांतील स्फोटकांचे अवशेष दिल्लीतील स्फोटात सापडलेल्या पदार्थांशी मिळतेजुळते असल्याचं फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
त्या वेळी पुण्यात कमी तीव्रतेचे स्फोट झाले होते म्हणून मोठी हानी टळली होती. मात्र या वेळी दिल्लीत त्याच पद्धतीचा अधिक शक्तिशाली अवतार वापरून मोठा स्फोट घडवण्यात आला. “तेव्हा पुण्यात जे अयशस्वी ठरलं, ते आता दिल्लीत यशस्वी झालं असं दिसतंय,” असं एका वरिष्ठ तपास अधिकाऱ्याने सांगितलं.
तपासातून या स्फोटाचा फरीदाबाद मॉड्यूलशी थेट संबंध असल्याचंही समोर आलं आहे. 10 नोव्हेंबर रोजी फरीदाबादमधून तब्बल 2,500 किलो स्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं होतं. या मॉड्यूलमध्ये अनेक डॉक्टर सामील असल्याचं समोर आलं आहे. पुलवामाचा रहिवासी डॉ. मुझम्मिल शकील याने फरीदाबादमध्ये स्फोटकं साठवली होती, तर अनंतनागचा डॉ. अदील अहमद राथर सोशल मीडियावरून युवकांना भडकवण्याचं काम करत होता.
दरम्यान, या प्रकरणात डॉ. शाहीन शाहिदचं नावही पुढे आलं आहे. तिच्या कारमधून शस्त्रांची वाहतूक करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. शाहीन ही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या महिला विंगची भारतातील प्रमुख असून, देशभरात नेटवर्क वाढवण्याचं काम तिला देण्यात आलं होतं, असा पोलिसांचा संशय आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, अनेक ठिकाणी छापे सुरू आहेत. या घटनेने दिल्लीसह देशभरात खळबळ माजली आहे.







