लोणी काळभोर, ता. 1: शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि पदोन्नतींमध्ये आरक्षण, विविध कल्याणकारी योजनांचा लाभ, आणि इतर सामाजिक व आर्थिक सवलती मिळविण्यासाठी जातीचा दाखला असणे गरजेचे आहे. या आरक्षणाच्या माध्यमातून अनेक नागरिकांना फायदा झाला आहे. मात्र थेऊर (ता. हवेली) येथे गत 50 वर्षापासून वास्तव्यास असलेला भिल्ल समाज हा जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय योजनांपासून वंचित होता. त्यामुळे त्यांनाही प्रवाहात आणण्यासाठी जातीचा दाखला मिळवून देण्याची गरज होती. अखेर शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या सहकार्यामुळे भिल्ल समाजाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. असे प्रतिपादन आरोग्यदूत तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पै. युवराज काकडे यांनी केले आहे.

थेऊर (ता. हवेली) येथील 100 भिल्ल कुटुंबांना हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्याहस्ते रविवारी (ता.31) जातीचे दाखले वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना वरील प्रतिपादन पै. युवराज काकडे यांनी केले. त्यावेळी लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते, थेऊरचे मंडल अधिकारी किशोर जाधव, प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके, माजी सदस्य विनोद माळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना युवराज काकडे म्हणाले की, भिल्ल समाज गेली अनेक वर्षांपासून थेऊर येथे मासेमारी व ढोल पथकाचा व्यवसाय करीत आहे. जातीचे दाखले मिळावेत म्हणून हा समाज अनेक वर्षांपासून झगडत आहे. परंतु, त्यांना नेतृत्त्व नसल्यामुळे दाखले मिळाले नव्हते. सर्व समाजाच्या वतीने जातीचा दाखल मिळावा. म्हणून माझ्याकडे मागणी केली. या मागणीची त्वरित दखल घेतली. आणि या समाजालाही जातीचे दाखले मिळावेत. म्हणून शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यामार्फत प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली. या मागणीची दाखल घेऊन थेऊर येथील 100 आणि नायगाव येथील 100 कुटुंबांना जातीचे दाखले दिले आहे.
जातीचे दाखले मिळाल्यानंतर भिल्ल समाजातील तरुणाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तो आनंद पाहिल्यानंतर आपण समाजाच्या हितासाठी एक चांगला उपक्रम राबविल्याचे समाधान झाले. या मिळालेल्या दाखल्यांमुळे, भिल्ल समाजातील येणारी पिढी ही, चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन, सुशिक्षित होण्यास मदत होणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभही, या समाजाला मिळणार आहे. तसेच जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर कटके व उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांची बहुमुल्य मदत मिळाली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
दरम्यान, हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने व लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांचे समाजाच्या वतीने पारंपरिक वाद्य वाजवत स्वागत करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात नायगाव येथील वास्तव्यास असलेल्या 100 भिल्ल समाजातील कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. मिळालेल्या जातीच्या दाखल्यामुळे भिल्ल समाजातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून, आभार मानले. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. परंतु, काही तांत्रिक कारणामुळे ते येऊ शकले नाहीत.
यावेळी थेऊरच्या ग्राम महसूल अधिकारी सरला पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश कुंजीर, अरुण संभाजी धारवाड, अमित धुळे, प्रशांत खांडे, सुरज सोनवणे, संग्राम गावडे, विशाल पवार, सलीम शेख, जयदीप दिवेकर, प्रकाश म्हस्के, दिपक शितोळे, रामदास बर्डे, गोवर्धन धारवाड, लहू पवार व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







