sharad pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. पण महाविकास आघाडी किंवा महायुतीनं अजून नीट सांगितलेलं नाही की निवडणुका कशा पद्धतीनं लढायच्या. अनेक ठिकाणी युतीत तणाव आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची घोषणा झाली आहे. या सगळ्या गोंधळात शरद पवारांनी मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे — स्थानिक नेत्यांना स्वतःचा निर्णय घेण्यासाठी मोकळं रान दिलं आहे. (sharad pawar)

पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले,
“युती करायची की नाही, कुणाशी करायची, हा निर्णय स्थानिक पातळीवर तुमच्याच हातात आहे. तिथली परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घ्या. निकालाचं ओझं तुमचंच असेल.” महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोक पक्ष पाहून नव्हे, तर स्थानिक नेत्यांना पाहून मतदान करतात. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना निर्णय घेऊ दिला आहे.
मुंबई महापालिकेबाबत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्याचं सांगितल्यावर पवार म्हणाले,
“त्यांचा तो निर्णय असेल तर त्यात गैर काही नाही. शिवाय मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचं नोटिफिकेशनही अजून आलं नाही.”
पवारांची बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया
यावेळी पवारांनी बिहार निवडणुकीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की तिथं महिलांनी मतदानात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या खात्यात आलेल्या १० हजार रुपयांचा परिणाम मतदानावर दिसला असावा. महाराष्ट्रातही “लाडक्या बहिणी”च्या योजनेतून निवडणुकांच्या आधी पैसे वाटण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
उघडपणे पैसे वाटप
पवारांनी यावर नाराजी व्यक्त करताना म्हणाले,
“सत्तेत असलेल्यांनी निवडणुकीआधी अशा पद्धतीनं पैसे वाटप सुरू ठेवलं, तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासच उडेल. निवडणूक आयोगाने याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला हवं. निवडणूक स्वच्छ आणि पारदर्शक असणं गरजेचं आहे.”







