Subhiksha Retail Fraud Case: व्यावसायिक जगात एखाद्या व्यक्तीने शून्यातून ४००० कोटींचे साम्राज्य उभे करणे ही मोठी गोष्ट मानली जाते, पण तेवढ्याच वेगाने जमिनीवर कोसळणे हे धक्कादायक असते. आर. सुब्रमण्यम यांनी सुभिक्षा नावाच्या रिटेल साखळीद्वारे संपूर्ण भारतात नाव कमावले होते. त्यांच्या कंपनीने देशभर १६०० पेक्षा जास्त दुकाने उघडली होती, जिथे एकाच छताखाली घरगुती सामान आणि औषधे मिळत असत. त्यांच्या या प्रगतीने मोठ्या कंपन्या आणि बँकांनाही थक्क केले होते. मात्र, आज सुब्रमण्यम हे यशाच्या शिखरावर नसून २० वर्षांचा तुरुंगवास भोगत आहेत. त्यांच्या लोभापायी एका सुवर्णकाळाचा अंत कसा झाला, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

सुब्रमण्यम यांची कारकीर्द बँकिंग क्षेत्रातून सुरू झाली, पण त्यांना स्वतःचे काहीतरी मोठे करायचे होते. त्यांनी सुरुवातीला विश्वप्रिया नावाची एक वित्तीय संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक करून घेतली. यातून जमलेल्या पैशांच्या जोरावर त्यांनी १९९७ मध्ये सुभिक्षाचा पाया घातला. सुरुवातीला चेन्नईत १ लाख डॉलरच्या गुंतवणुकीतून सुरू झालेले हे छोटे स्टोअर पुढे जाऊन देशातील सर्वात मोठी रिटेल चेन बनले. मध्यमवर्गीयांसाठी हे सुपरमार्केट आवडीचे ठिकाण बनले होते, कारण तिथे सर्व वस्तू स्वस्त दरात मिळत असत.
मात्र, या झगमगाटामागे फसवणुकीचे मोठे जाळे विणले जात होते. सुब्रमण्यम यांनी गुंतवणूकदारांचा पैसा योग्य ठिकाणी न लावता बनावट कंपन्यांमध्ये वळवला होता. जेव्हा गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याची वेळ येत असे, तेव्हा ते पुन्हा नवीन योजनांचे आमिष दाखवून लोकांना गुंतवून ठेवत. हा खेळ जास्त दिवस टिकला नाही आणि कंपनीची आर्थिक स्थिती बिघडल्याने सुभिक्षाचे शटर कायमचे डाऊन झाले. चेन्नईच्या न्यायालयाने सुब्रमण्यम यांना दोषी ठरवून त्यांच्यावर मोठा दंड आणि २० वर्षांची शिक्षा सुनावली. अशा प्रकारे एका मोठ्या व्यवसायाचा शेवट फसवणूक आणि गुन्हेगारीने झाला.







