मुजफ्फरनगर: उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या नवऱ्याचा गळा दाबून खून केला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. चौकशीत धक्कादायक कारण समोर आले आहे. नवरा पहिल्या पत्नीला अधिक वेळ द्यायचा आणि तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. या गोष्टीमुळे ती संतप्त झाली आणि रागाच्या भरात तिने नवऱ्याचा खून केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुजफ्फरनगर जिल्ह्यातील टांडा मजरा गावात घडली आहे. 40 वर्षीय संजय कुमारने दोन विवाह केले होते. पहिली पत्नी दुसऱ्या गावात राहत होती, तर दुसरी पत्नी कविता (वय 30) त्याच्यासोबत राहात होती. संजयने 2000 मध्ये कविताशी लग्न केले होते. 29 ऑगस्टच्या रात्री कविताने नवऱ्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संजयचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. आरोपी पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
चौकशीत कविताने गुन्ह्याची कबुली दिली. तिने पोलिसांना सांगितले, “माझा नवरा सतत पहिल्या बायकोला अधिक महत्व द्यायचा. माझ्याकडे तो दुर्लक्ष करायचा. तो तिच्यासोबतच जास्त वेळ घालवायचा. याच रागातून मी त्याचा खून केला.” या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशमध्ये मोठी खळबळ उडाली असून परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.







