गांधीनगर: गांधीनगरमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील कलोल तालुक्यातील बोरिसाना गावात एका व्यक्तीनं त्याच्या दोन निष्पाप मुलींसह नर्मदा कालव्यात उडी घेऊन जीव दिल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनं बोरिसाना गावावर शोककळा पसरली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, धीरज भाई भालाभाई रबारी असं आत्महत्या केलेल्या इसमाच नाव आहे. दोन लेकींचं आधार कार्ड बनवण्यासाठी जातोय, असं सांगून धीरज भाई घरातून निघून गेले होते. मात्र बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधा शोध सुरु केली.
दरम्यान, बराच वेळ होऊनही धीरज आणि त्याच्या दोन्ही मुली हे तिघे सापडले नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी सांतेज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरात शोध घायला सुरुवात केली. तेंव्हा आज सकाळी कलोल येथील नर्मदा कालव्यात एका मुलीचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी शोधकार्य युद्ध पातळीवर करायला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने धीरज आणि दुसऱ्या मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.
धीरज याने त्यांच्या दोन लेकींसह आयुष्य का संपवलं, याचा शोध पोलीस घेत आहेत.







