मुंबई: अशोक खरात प्रकरणाने राज्यातील (Rupali Chakankar) राजकारणाला मोठा धक्का दिला असून आता या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, असा स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे या (Ashok Kharat Case) प्रकरणात राजकीय जबाबदारी निश्चित होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. (Latest Marathi News)

अशोक खरातवर शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असताना त्याच्यासोबतचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात होती. सार्वजनिक पदावर असताना अशा व्यक्तींसोबत संबंध दिसणे हे नैतिकतेच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा मुद्दा पुढे केला जात होता.
वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता त्यांचा राजीनामा जवळपास निश्चित मानला जात आहे.
रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याला केवळ प्रशासकीय नव्हे तर राजकीय महत्त्वही आहे. या निर्णयामुळे सरकारवर वाढत असलेला दबाव कमी करण्याचा प्रयत्न असल्याचेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांनीही पत्रकार परिषद घेऊन चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच, चाकणकर यांनी यापूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती.
एकूणच, अशोक खरात प्रकरणाचा प्रभाव आता थेट सत्ताकारणावर दिसून येत असून, या प्रकरणातून पुढे आणखी कोणते राजकीय परिणाम घडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.







