पुणे: पुणे (Pune News)महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील लोकप्रतिनिधींच्या मुलांना किंवा नातेवाईकांना या निवडणुकीत उमेदवारी न देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत घराणेशाहीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पुण्यातील जवळपास 6 लोकप्रतिनिधी आपल्या कुटुंबातील 9 सदस्यांसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही होते. तसेच पिंपरी चिंचवडमध्येही अशाच प्रकारे 2 जणांसाठी प्रयत्न सुरू होते. संपूर्ण राज्याचा विचार केला तर हा आकडा 100 च्या पुढे जात असल्याने पक्षाने हा कठोर नियम लागू करण्याचे ठरवले आहे. 48 तासांच्या कालावधीत हा मोठा बदल घडवून आणल्याने इच्छुकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामध्ये खडकवासला मतदारसंघातील आमदार भीमराव तापकीर यांचे पुतणे अभिषेक यांच्या उमेदवारीवर संकट आले आहे. मात्र वर्षा तापकीर या स्वतः 3 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या असल्याने त्यांची बाजू काहीशी जमेची मानली जात आहे.
दुसरीकडे वडगाव शेरीमधील राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र हे भाजपमध्ये सामील झाले असून त्यांचे वडील दुसऱ्या पक्षात असल्याने त्यांना या नियमातून सूट मिळू शकते. तसेच खासदार मोहोळ यांचे चुलत बंधू श्रीधर मोहोळ यांच्या प्रभागात सक्षम पर्यायाचा अभाव असल्याने त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. दिवंगत नेते गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना या निवडणुकीत सवलत मिळण्याची चिन्हे आहेत.
मात्र आमदार सुनील कांबळे यांची कन्या सुप्रिया आणि राज्यमंत्री मिसाळ यांचे चिरंजीव करण यांची नावे उमेदवारीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. मिसाळ यांच्या कुटुंबातून मानसी देशपांडे या 3 वेळा निवडून येऊनही त्यांना केवळ नातेवाईक असल्याने पदे मिळाली नाहीत अशी नाराजी व्यक्त होत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या नियमाची कडक अंमलबजावणी झाल्यास अनेक नवीन चेहऱ्यांना महापालिकेत निवडून येण्याची संधी मिळणार आहे. सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी पक्षाने हे पाऊल उचलल्याचे भाजपच्या कोअर कमिटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.







