मुंबई: मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला (Maharashtra Politics) असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लवकरच मोठे संघटनात्मक आणि मंत्रिमंडळातील (Shivsena) बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत पक्षाला मिळालेल्या यश-अपयशाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय आकार घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. (Latest Marathi News)

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित कामगिरी झाली नसल्याची नोंद शिंदे यांनी घेतली आहे. काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांना थेट कानपिचक्या दिल्याचे सांगितले जाते. 2 ते 4 मंत्र्यांना लवकरच पदावरून दूर केले जाऊ शकते आणि त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो.
निवडणुकांतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी शिवसेनेच्या जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना गावागावांत जाऊन संघटना मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपेक्षित यश का मिळाले नाही, स्थानिक पातळीवर कुठे कमतरता राहिली, याचा सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदे यांनी मंत्र्यांना इशारा दिला होता की, केवळ ताफा घेऊन फिरणे पुरेसे नाही, तर संघटनात्मक कामगिरीही दिसली पाहिजे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर वगळता इतर महानगरपालिका क्षेत्रांत पक्षाला मोठा फटका बसला. काही प्रभावी नेत्यांच्या नातेवाईकांनाही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता कामगिरीच्या आधारेच जबाबदाऱ्या ठरवण्याचा स्पष्ट संदेश देण्याची तयारी सुरू आहे.
या संभाव्य फेरबदलांमुळे शिंदे गटात नव्या नेतृत्वाला संधी मिळू शकते आणि आगामी निवडणुकांपूर्वी पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आता कोणावर कारवाई होणार आणि कोणाला संधी मिळणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







