पुणे: राज्यात तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या 29 महापालिकांच्या (Maharashtra Municipal Election 2026) निवडणुकांसाठी आज दिवसभर उत्साहात (Pune Mahapalika Election) मतदान प्रक्रिया पार पडली. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सकाळपासूनच मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले होते. 100 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांपासून ते पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या झेन झी (Maharashtra Election Exit Poll) मतदारांपर्यंत सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. मात्र या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचं चित्र समोर आलं आहे. (Latest Marathi News)

विशेषतः मुंबईत मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या घसरल्याचं दिसून आलं. दुपारी 3.30 वाजेपर्यंत मुंबईत केवळ 41.08 टक्के मतदान झालं होतं. त्यातही कुलाबा येथील वॉर्ड क्रमांक 227 मध्ये दुपारी 3.30 वाजेपर्यंत अवघे 15.73 टक्के मतदान झालं असून हा कदाचित राज्यातील सर्वात कमी मतदान झालेला वॉर्ड ठरण्याची शक्यता आहे. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतची अंतिम आकडेवारी जाहीर झाल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यातील इतर शहरांमध्येही मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी असल्याचं दिसून येत आहे. पुण्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 36.95 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 40.50 टक्के, सोलापुरात 40.39 टक्के, नाशिकमध्ये 39.64 टक्के तर जळगावमध्ये केवळ 34.27 टक्के मतदान झालं. सोलापुरात अंतिम मतदान टक्का 52 ते 55 टक्क्यांदरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूरमध्ये 50.85 टक्के, परभणीत 49.16 टक्के, अहिल्यानगरमध्ये 48.49 टक्के आणि वसई-विरारमध्ये 45.75 टक्के मतदान झालं असून काही शहरांमध्ये तुलनेने समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे.
महापालिका निवडणुका म्हणजे शहराच्या कारभाराची दिशा ठरवणारा कौल. मात्र महानगरांमध्ये सातत्याने घसरत चाललेला मतदानाचा टक्का लोकशाहीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. नागरिकांचा वाढता उदासीनपणा, राजकारणावरील नाराजी आणि व्यवस्थेवरील अविश्वास हे यामागील महत्त्वाचे कारण मानले जात आहेत. निकालाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, कोणत्या शहरात कोणाच्या हाती सत्ता जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.







