मुंबई: त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यासंदर्भातील घोषणा केली असून, आधी त्यांनी तेलंगणाचे राज्यापाल म्हणून काम पहिले आहे. राजभवनाची सूत्रे एका अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच्या हाती सोपवण्यात आली आहेत.

कोण आहेत जिष्णू देव वर्मा?
15 ऑगस्ट 1957 रोजी जन्मलेले जिष्णू देव वर्मा हे केवळ राजकारणी नाहीत, तर ते त्रिपुराच्या राजघराण्याचे वंशज आहेत. 1990 च्या दशकात जेव्हा ईशान्य भारतात भाजपचे अस्तित्व नगण्य होते, तेव्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. डाव्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची पाळेमुळे घट्ट करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2018 ते 2023 या काळात त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून अर्थ, नियोजन आणि ऊर्जा अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
महाराष्ट्र हे देशातील राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. येथील गुंतागुंतीचे राजकारण आणि प्रशासकीय बारकावे हाताळण्यासाठी केंद्र सरकारला एका संयमी आणि अनुभवी चेहऱ्याची गरज होती. जिष्णू देव वर्मा हे यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेले निकटचे संबंध यामुळे त्यांची ही नियुक्ती राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे. नव्या राज्यपालांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून मर्यादित नाही. ते एक उत्तम कवी, लेखक आणि क्रीडाप्रेमी आहेत.







