मुंबई: राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व यंत्रणांना उच्चस्तरीय सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. जीवितहानी, पशुधन व घरांचे नुकसान यासंदर्भात तातडीने मदत पुरविण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे 12 ते 14 लाख एकरवरील शेतीचे पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एनडीआरएफच्या निकषांनुसार भरपाई देण्याच्या कार्यवाहीस सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पावसाचा जोर अद्याप कायम आहे. त्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे दर तीन तासांनी राज्यातील नागरिकांना सतर्कतेचे अलर्ट देण्यात येत आहेत.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाली असून, आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. सर्व जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षांना परस्पर समन्वय राखत सतत माहिती आदानप्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.







