मुंबई: राज्यात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर (Harshwardhan Sapkal ) जल्लोषाची तयारी सुरू असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी टिपू सुलतानच्या कार्याचा उल्लेख करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला. या वक्तव्यात (Maharashtra Politics) शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानसोबत केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. (Breaking News)

भाजपच्या नेते आणि आमदारांनी सपकाळ यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला असून विशिष्ट मतदारसंघाला खूश करण्यासाठी असे विधान केले जाते, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. काही ठिकाणी शिवप्रेमींनी आक्रमक भूमिका घेत सपकाळ यांच्या निवासस्थानीही धाव घेतली. सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून मोठी चर्चा रंगली.
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावा केला आहे. भाजपने जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून चुकीच्या पद्धतीने विधान पसरवले, असे त्यांनी म्हटले. तसेच, माझ्या शब्दांमुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्ट करत त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे भूमिका मांडली. कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील “भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी” या ओळी उद्धृत करत आपला संदेश दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे शिवजयंतीपूर्वी राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले असून, पुढील काही दिवसांत या वादाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







