मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar Plane Crash) विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणात(Ajit Pawar Death) सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे रोहित पवार यांनी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी आणि VSR कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या आरोपांमुळे आणि तपासातील उघड होत असलेल्या मुद्द्यांमुळे या कंपनीवर संशयाचे सावट गडद होत आहे. (Eknath Shinde)

याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी VSR व्हेंचर्स प्रा. लि. या कंपनीची विमाने यापुढे वापरणार नसल्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी याबाबत सूचना केल्यानंतर हा निर्णय मान्य करण्यात आला. त्यामुळे यापुढे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करणार नाहीत.
अजित पवार यांच्या दुर्घटनेनंतर VSR कंपनीच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. सुरक्षा नियमांचे उल्लंघन, देखभाल प्रक्रियेतील त्रुटी आणि तपासातील विसंगती यांबाबत आरोप झाले. काही बाबींची प्राथमिक पुष्टीही समोर आल्याने कंपनी आधीच चौकशीच्या भोवऱ्यात आहे.
या निर्णयामुळे राजकीय पातळीवर एक संदेश गेला असल्याचे मानले जाते. तपास पूर्ण होईपर्यंत सावध भूमिका घेण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अपघाताच्या चौकशीबाबत अधिकृत अहवालाची प्रतीक्षा कायम असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






