पुणे: धावपळीच्या (Food Safety) जीवनात स्वयंपाकाचा वेळ वाचवण्यासाठी आपण अनेक भाज्या आधीच चिरून, कापून किंवा सोलून फ्रीजमध्ये ठेवतो. ही सवय आपल्याला सोयीची वाटत असली, तरी ती तुमच्या आरोग्यासाठी आणि भाजीतील पोषक तत्वांच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक ठरू शकते. चिरलेल्या भाज्या लवकर खराब होतातच, पण त्यातील जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स कमी होतात आणि काही भाज्या तर फ्रीजमध्ये विषारी बनू शकतात.

पोषक तत्वे का कमी होतात?
भाजी चिरल्यावर ती लगेच हवेच्या संपर्कात येते आणि ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरू होते. यामुळे भाजीतील व्हिटॅमिन सी आणि बी सारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे अत्यंत वेगाने नष्ट होतात. याशिवाय, चिरलेल्या भाज्यांमध्ये असलेला ओलावा किंवा पाणी फ्रीजमधील थंड आणि दमट वातावरणात बॅक्टेरियाआणि बुरशी वाढण्यास मदत करतो.
योग्य पद्धत काय आहे?
वेळेची बचत करण्याच्या नादात पौष्टिकतेशी तडजोड करणे योग्य नाही. आरोग्य तज्ज्ञ सल्ला देतात की, भाज्या नेहमी स्वयंपाक करण्याच्या अगदी आधीच चिराव्यात. जर तुम्हाला तयारी करून ठेवायची असेल, तर भाज्या केवळ स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून हवाबंद डब्यात ठेवाव्यात.







