पुणे: पुणे शहरात थंडीने (Weather Report) चांगलेच बस्तान बसवले असून गुरुवारी यंदाच्या (Weather Forecast) हंगामातील आतापर्यंतचे सर्वात (Maharashtra Weather) कमी तापमान नोंदवले गेले. गुरुवारी शहरात किमान तापमान 7.9 अंश सेल्सिअस इतके होते. पहाटे कडाक्याची थंडी जाणवत होती आणि दिवसाही हवेत गारवा कायम होता. सकाळच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला असून नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर वाढवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता असून थंडीचा प्रभाव आणखी वाढू शकतो.

दरम्यान, मुंबईतही थंडीचा अनुभव येऊ लागला आहे. राज्यातील अनेक भागांत किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यानंतरही मुंबईकरांना थंडीची फारशी जाणीव होत नव्हती. मात्र शुक्रवारी पहाटे मुंबईत गारठा जाणवला. सांताक्रूझ येथे शुक्रवारी किमान तापमान 14.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना हुडहुडी भरली होती. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारीही मुंबईतील किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईसह राज्यातील विविध भागांत थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
नाशिक शहरात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. गुरुवारी शहरात किमान तापमान 8.2 अंश सेल्सिअस होते, ते शुक्रवारी 24 तासांत 7.8 अंशांपर्यंत खाली आले. शहरात यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून पहाटे कडाक्याची थंडी होती. दिवसाही हवेत गारवा जाणवत असल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला.
उत्तर महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. अहिल्यानगर येथे किमान तापमान 7.3, जळगावात 6.9, मालेगावात 8.4, नंदुरबारमध्ये 14.1, छत्रपती संभाजीनगरमध्ये 10.6, तर महाबळेश्वरमध्ये 12.2 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांत तापमान एक अंकी पातळीवर गेल्याने थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.







