लोणी काळभोर: राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सतत अपयश येऊन देखील, स्वतःच्या उराशी व आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हार न मानता, स्वतःला सिद्ध करत एक डझन मेन्स, तीन राज्यसेवा मुख्य परीक्षा दिल्या मात्र यश येत नव्हते. मात्र मे 2025 साली दिलेल्या उद्योग निरीक्षक पदाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत सचिन धुमाळ यांनी राज्यात 5 व्या क्रमांकाने उद्योग निरीक्षकपदी पदाला गवसणी घातली आहे. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा..

कुंजीरवाडी येथील सचिन धुमाळ यांचे प्राथमिक शिक्षण थेऊर फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यापुढील शिक्षण घेताना घरातील कर्ते वडील व आजोबा यांचे आकस्मित निधन झाले. घरात आलेल्या आपत्तीमुळे पुढील शिक्षण सोरतापवाडी येथील मामा प्रा. पाटील चौधरी व प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोरतापवाडी (ता. हवेली) येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर ज्युनियर कॉलेज व अभियंताची डिग्री 2014 पूर्ण केली.
डिग्रीला असल्याच्या अगोदरपासूनच राज्यसेवा व लोकसेवा परीक्षेचा छंद होता. तसेच मामा प्राचार्य असल्याने त्यांच्याकडून प्रेरणा मिळत गेली. राज्यसेवा व लोकसेवा परीक्षेचा छंद असल्याने अभ्यास करायचा होता. मात्र शिक्षणासाठी कर्ज काढले होते. हे कर्ज फेडण्यासाठी 2 वर्ष एका खाजगी ठिकाणी नोकरी केली. त्यातून 70 ते 75 टक्के कर्ज फेडले. त्यानंतर अभ्यास करण्यास सुरुवात केली. सुरुवातील क्षेत्रीय परिवहन कार्यालय (RTO) पहिल्याच प्रयत्नात पास झाले. मात्र मुख्य परीक्षेत गुण कमी मिळाले. त्यानंतर बऱ्याच राज्यसेवा व लोकसेवेच्या परीक्षा दिल्या. काहित यश मिळत होते. तर काहित अपयश मिळत होते. तसेच 2020 मध्ये राज्य उत्पादन शुल्क पोलीस उप निरीक्षकपद हे 2 गुणांनी हुकले होते. याची खंत कायम मनात राहिली. यशाच्या शिखरावर पोचत असताना अचानक पायथ्याशी आल्याने, थोडे निराश झाले. परंतु स्वतःचे खच्चीकरण होऊ दिले नाही. त्यातूनच राज्यसेवा गट -ब व गट क च्या अभ्यासाची पायाभरणी सुरु केली.
कोरोना काळात अभ्यास सुरु होता. मात्र परीक्षा होत नव्हत्या. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत पास झाले मात्र, मुलाखतीत अगदी थोड्या गुणांनी बाहेर पडले. मग सचिन यांनी पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला सुरवात केली. मुलाखतीपर्यंत मजल मारली. परंतु अपेक्षित यश संपादन करता आले नाही. सलग दोन वेळा अपयश आल्यानंतर जिद्द मात्र कधीही सोडली नाही. हार न मानता संयम बाळगून, मागील चुकांची दुरुस्ती करून, पुन्हा परीक्षेला सामोरे गेले.
मे 2025 साली दिलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्य परीक्षा भरतीचा निकाल डिसेंबर मध्ये लागला. उद्योग निरीक्षक म्हणून राज्यात 5 व्या क्रमांकाने निवड झाली. या परीक्षेत राज्यातुन 38 जागा होत्या. त्यात ओपनसाठी फक्त 7 जागा होत्या. यामध्ये राज्यात पाचव्या क्रमांकाने धुमाळ यांनी हे यश मिळवले आहे. तसेच तीन महिन्यांपूर्वी कनिष्ठ लेखापाल आणि लेखा परीक्षक, लेख कोशागर विभाग, कोकण प्रदेश या ठिकाणी निवड झाली होती.
याबाबत बोलताना सचिन धुमाळ म्हणाले, “राज्यसेवा व लोकसेवा या दोन्ही परीक्षा संयमाच्या आहेत. वेळ आणि संयमाची सांगड घालून यश खेचून आणता येते. या क्षेत्रात अभ्यास करणाऱ्यावर विश्वास दाखवावा. जेणेकरून त्याच्यावर दडपण न देता आत्मविश्वास द्यावा. हे क्षेत्रच असे आहे की आयुष्य घडवताना मोठा हातभार आवश्यक आहे. निरागस स्वप्नांचा हा पाठलाग होता. त्यांच्यामुळेच हे यश संपादन करू शकलो, “शर्यत अजून संपलेली नाही कारण मी आजून जिंकलेलो नाही. असेही धुमाळ म्हणाले.”







