पुणे: मराठा समाजाच्या आर्थिक विकासासाठी (Rahul Kul) आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मंजूर झालेली इरादा पत्रे आणि व्याज परतावा वेळेत देण्यात यावा, अशी ठाम मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल यांनी केली आहे. जलसंपदा मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नागपूर येथे 10 डिसेंबर रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी हे मुद्दे उपस्थित केले. (Pune News)

या बैठकीत आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजातील अडचणी आणि विविध प्रलंबित योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार राहुल दादा कुल म्हणाले की, 9 ऑक्टोबर 2025 पासून महामंडळाकडून पात्र लाभार्थ्यांना इरादा पत्र देणे पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. त्यामुळे ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर यांसारखी व्यावसायिक वाहने खरेदी करता न आल्याने अनेक मराठा तरुणांचे व्यवसाय थांबले असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या रोजगारावर झाला आहे.
तसेच राज्य सरकारकडून निधी वितरित करण्यात आलेला असतानाही महामंडळाकडून व्याज परतावा वेळेवर दिला जात नसल्याने अनेक लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे प्रलंबित इरादा पत्रे आणि थकीत व्याज परतावा तातडीने वितरित करावा, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार राहुल कुल यांनी आणखी काही गंभीर बाबींचा उल्लेख केला. महामंडळाचे 2013 पासून ऑडिट झालेले नसल्याने त्यामागची कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच महामंडळाकडून विकसित करण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरची सद्यस्थिती तातडीने जाहीर करावी, असेही ते म्हणाले. मराठा तरुण-तरुणींसाठी उच्च शिक्षण कर्ज व व्याज परतावा तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांसाठी 1 ते 2 लाख रुपयांचे कर्ज व व्याज परतावा या ठरावांवरही तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी बैठकीत मांडली.
मराठा समाजाच्या आर्थिक विकासासाठी महामंडळाचे कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक होणे आवश्यक असल्याचे आमदार राहुल दादा कुल यांनी स्पष्ट केले. या बैठकीस आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार निरंजन डावखरे, अभिमन्यू पवार, व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख, नियोजन विभागाचे सहसचिव विवेक गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.







