पुणे : विधानसभा निवडणुकांमुळे मागील चार महिन्यापासून रखडलेली कालवा समितीची बैठक आज होणार आहे. या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत चर्चा होणार आहे. याआधी पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुण्याला अतिरिक्त पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याच्या पाण्याचा फैसला आज कालवा समितीच्या बैठकीत होणार असल्यामुळे पुणेकरांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज होणारी कालवा समितीची बैठक घेणार असून या बैठकीत जून 2025 अखेरपर्यंतचा महापालिकेचा पाणीपुरवठा निश्चित केला जाणार आहे. पुणे महापालिकेला सध्या 14.50 टीएमसी इतका पाणी कोटा मंजूर आहे. वास्तविक पुण्याची लोकसंख्या पाहता 24 टीएमसी पाणी पुणेकरांना लागणार आहे. मात्र पुणे महापालिका मंजूर पाणी कोट्यापेक्षा अधिक २२ टीएमसी पाणी उचलत आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी उचलण्याबाबत; तसेच वापरात येत असलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करीत नसल्याने पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाने दंड आकारणी केली आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने अतिरिक्त पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी या बैठकीत पूर्ण होणार का याकडे पुणेकरांचें लक्ष लागले आहे. तसेच पुणेकरांना की पिंपरी चिंचवड अतिरिक्त कोटा मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणांत आजमितीला १७.११ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ५८.६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची मागणी ही वाढत आहे.पुणे महापालिका हद्दीत गावे समाविष्ट झाल्यानंतर २०२४-२५ साठी आवश्क २१ टीएमसी पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. महापालिकेचा आवश्यक असलेले पाणी कालवा समितीत मंजूर न झाल्यास पुणेकरांवर ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे.