पुणे : महापालिका निवडणुकीची (Pune News) आचारसंहिता लागू झाल्यानंतर (Naval Kishor Ram) शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून जाहिरात फलकांवरून वाद निर्माण झाला आहे. आचारसंहिता लागू असताना कोणतेही जाहिरात फलक लावताना महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र अनेक इच्छुक उमेदवार आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असून शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.

इच्छुक उमेदवारांकडून देवदर्शनाच्या सहली, महिलांसाठी विशेष कार्यक्रम आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांची माहिती देणारे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले असून त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. आचारसंहिता लागू असताना असे फलक लावणे नियमबाह्य असून संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
महापालिका आयुक्त आणि महापालिका मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले की, जाहिरात फलकांवर जर कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव, चिन्ह किंवा उल्लेख आढळून आला, तर त्या फलकांचा संपूर्ण खर्च संबंधित राजकीय पक्षाच्या निवडणूक खर्चात धरला जाणार आहे. आचारसंहिता कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. ही घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी दुपारी 4 वाजता केली. त्यानंतर पुणे शहरात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.
आचारसंहिता लागू होताच महापालिकेने शहरातील विविध भागांत राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून लावण्यात आलेले जाहिरात फलक काढून टाकण्याची मोहीम सुरू केली आहे. महापालिकेच्या वतीने कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर उपस्थित होते.







