Pune : पुण्यात प्रथमच राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत असून क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना ठरली आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियम येथे नॅशनल व्हीलचेअर क्रिकेट चॅम्पियनशिप पार पडत आहे. देशभरातील दिव्यांग क्रिकेटपटूंना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

ही स्पर्धा Wheelchair Cricket India आणि Maharashtra Wheelchair Cricket Association यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. वेस्ट झोनसाठी ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. याआधी उदयपूर, गोवा आणि ओडिशा येथे सामने झाले होते; मात्र पुण्यात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील सामने होत असल्याने स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये विशेष उत्साह आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई हे 3 संघ सहभागी झाले आहेत. सर्व खेळाडू राष्ट्रीय स्तरावरचे असून त्यांचे वय 21 ते 37 वर्षांदरम्यान आहे. महाराष्ट्र संघासाठी राज्यभरातून निवड प्रक्रिया राबवण्यात आली. निवड चाचण्या नियमित क्रिकेटप्रमाणेच घेतल्या जातात आणि कामगिरीच्या आधारे अंतिम संघ ठरवला जातो.
स्पर्धा T-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जात असून नियम पारंपरिक क्रिकेटसारखेच आहेत. फरक इतकाच की खेळाडू सर्व कृती व्हीलचेअरवर बसून करतात. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना त्यांना अतिरिक्त समन्वय आणि फिटनेसची आवश्यकता असते. पिच आणि बाउंड्रीमध्ये काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून खेळ सुरक्षित आणि स्पर्धात्मक राहील.
गेल्या 3 वर्षांत महाराष्ट्रातील संघाने विविध राज्यांत सातत्याने सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेमुळे दिव्यांग खेळाडूंना केवळ क्रीडाप्रतिभा दाखवण्याची संधी मिळत नाही, तर समाजात समावेशकतेचा संदेशही दिला जातो. पुण्यातील आयोजनामुळे व्हीलचेअर क्रिकेटबाबत जागरूकता वाढण्याची आणि अधिक खेळाडूंना पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.







