पुणे : राज्यभरातील महापालिकांचे आणि अन्य क्षेत्रिय कार्यालयाचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने शंभर दिवसाचा कृती आराखडा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानुसार महानगरपालिका संचालनालयाने राज्यातील 22 महानगरपालिका पैकी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सहा महापालिकांची निवड केली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका अव्वल ठरली आहे. ई -प्रशासन,पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा,स्वच्छता,अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट, नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि आधुनिक सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्याने महापालिकालाही यश प्राप्त झाले आहे.
राज्य सरकारच्या वतीने ‘शंभर दिवसांचा कृती आराखडा’ उपक्रमाचा मध्यावधी आढावा २७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि वरिष्ठ राज्य आणि क्षेत्रीय प्रशासकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे आयुक्त शेखरसिंह यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने उच्च कार्यक्षमतेचा स्तर गाठला असून भविष्यात ही नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. राज्य शासनाच्या वतीने शंभर दिवसाचा कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेचा डंका असून या उपक्रमाचे अंतिम पुनरावलोकन एप्रिलमध्ये होणार आहे.