Nanded Rain : नांदेड जिल्ह्यातील हवामानाने गेल्या दोन दिवसांत अचानक कलाटणी घेतली असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेण्याची भीती निर्माण केली आहे. विशेषतः किनवट तालुक्यात सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत असल्याने पुढील काही दिवसांविषयीची चिंता आणखी वाढली आहे.

रविवारी रात्री उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावली आणि सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास पुन्हा जोरदार सरी कोसळल्या. सध्या हरभऱ्याची काढणी ऐन जोमात सुरू आहे, तर गहू, ज्वारी आणि मका ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. अशा वेळी झालेल्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेला हरभरा भिजला असून त्याच्या दर्जावर परिणाम होण्याची भीती आहे. ओलाव्यामुळे गव्हाचे दाणे काळवंडण्याची शक्यता आहे, तर मका पिकात पाणी साचल्यास खोड आडवे पडणे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान काही भागांत गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. गारपीट झाल्यास हरभऱ्याच्या शेंगा झडण्याची शक्यता असून उत्पादनात मोठी घट येऊ शकते. आधीच बियाणे, खत आणि मजुरीचा खर्च वाढलेला असताना या नैसर्गिक संकटामुळे आर्थिक फटका बसणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काढलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवणे, ताडपत्रीने झाकणे आणि शक्य तितक्या लवकर काढणी पूर्ण करणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकृत हवामान अंदाजावरच विश्वास ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे.
आता प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी किनवटसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून जोर धरत आहे. अवकाळी पावसाचा हा तडाखा रब्बी हंगामाच्या यशावर पाणी फेरणारा ठरू नये, अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.







