पुणे: २९ महानगरपालिकांच्या (Municipal Corporation Election Results) निवडणुकांचा आज निकाल जाहीर होत आहे. काल मतदान पार पडल्यानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारी १२ पर्यंत काहीसे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. केवळ शहरांचा विकासच नव्हे, तर आगामी निवडणुकांपूर्वी कोणत्या पक्षाची ताकद किती, याचे उत्तर आजच्या निकालातून मिळणार आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबईत यावेळी चुरस प्रचंड आहे. एकत्र आलेले ठाकरे बंधूंची जोडी महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवणार की, सत्ताधारी त्यांना रोखणार? हा प्रश्न केवळ सत्तेचा नसून अस्तित्वाचा आहे. पुण्यापासून नागपूरपर्यंत आणि नाशिकपासून संभाजीनगरपर्यंत सर्वच बड्या शहरांमध्ये स्थानिक आघाड्यांनी प्रस्थापितांना तगडे आव्हान दिले आहे.
मुंबई वगळता इतर सर्व शहरांमध्ये ‘बहुसदस्यीय प्रभाग रचना’ असल्याने मतदारांमध्ये मोठा गोंधळ होता. ४ सदस्यांचा एक प्रभाग असल्याने अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी प्रस्थापित पक्षांच्या नाकीनऊ आणले आहेत. ज्या उमेदवारांचे व्यक्तिगत नेटवर्क मजबूत आहे, त्यांनाच या रचनेत यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
जालना (६१%) आणि परभणीत (६६%) झालेली मोठी मतदानाची टक्केवारी सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरू शकते. मुंबई आणि पुण्यात मतदारांमध्ये नेहमीप्रमाणे निरुत्साह दिसला असून येथे ५२ ते ५५ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत एकूण ५६.६७ टक्के मतदान झाले. कमी मतदानाचा फटका नक्की कोणाला बसणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.







