पुणे: लोकप्रिय विनोदी अभिनेता कपिल शर्मा याचा नवीन चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची संकल्पना “प्रेम म्हणजे बदलणे नव्हे, तर आहे तसेच स्वीकार करणे” या विचाराभोवती फिरते. कपिल शर्माची हलकीफुलकी कॉमेडी प्रेक्षकांना आकर्षित करू शकते का, ते पाहूया

गोंधळातून निर्माण होणारी कथा
चित्रपटाची कथा भोपाळमधील मोहन शर्मा (कपिल शर्मा) या एका साध्या तरुणाभोवती फिरते. मोहनचे प्रेम त्याची गर्लफ्रेंड सानिया (हीरा वरीना) हिच्यावर आहे. मात्र, धर्म आणि कुटुंबाच्या विरोधामुळे त्यांच्या लग्नात अडथळा येतो. सानियाशी लग्न करण्यासाठी मोहन महमूद हे मुस्लिम नाव स्वीकारतो, परंतु इथे एक मोठा ‘ट्विस्ट’ येतो. तो सानियाऐवजी रूही (आयशा खान) हिच्याशी लग्न करतो.
या निकाहनंतर मोहनचे कुटुंबीय त्याचे मीरा (त्रिधा चौधरी) हिच्याशी लग्न लावून देतात. नंतर तो मायकल या नावाने जेनी (पारुल गुलाटी) हिच्याशीही विवाह करतो. अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या धर्मांच्या ओळखी आणि खोट्या कहाण्यांमध्ये मोहन अडकतो. मोहनचे प्रेम पूर्ण होते का, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
कॉमेडी आणि सामाजिक संदेश
चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे यात लॉजिकचा अभाव असला तरी, कॉमेडीचा तगडा डोस आहे. कपिल शर्माच्या नैसर्गिक कॉमिक टायमिंग, मजेदार एक्स्प्रेशन आणि हावभावांमुळे चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत पकडून ठेवतो. पण कथानक थोडे अधिक चांगले हवे होते. दरम्यान, यो यो हनी सिंह चे एक गाणे नक्कीच लक्ष वेधून घेतो. ॲक्शनपट आवडत नसलेल्या प्रेक्षकांसाठी मनमुराद हसण्यासाठी हा चित्रपट तुम्ही नक्की पाहू शकता.







