भिगवण: तक्रारवाडी (ता. इंदापूर) (Indapur News) जिल्हा परिषद शाळेत मंजूर बारा वर्गखोल्यांच्या बांधकामासंदर्भातील घडामोडी गावभर चर्चेचा विषय बनल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अधिकृत बैठकीनंतर भिगवणमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा जोर धरत आहे. या बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना एकेकट्याने बोलावून बारा वर्गखोल्यांऐवजी आठच खोल्या का योग्य आहेत, हे समजावून सांगितल्याचे बोलले जात आहे. या एकांत चर्चेमुळे गावकऱ्यांच्या मनात संशयाचे ढग दाटले असून, “यात काहीतरी गुप्त हेतू दडलेला आहे” अशी कुजबुज कट्ट्याकट्ट्यावर रंगत आहे.

गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय
शालेय व्यवस्थापन समितीमध्ये एकमत दिसून येत नाही. बारा वर्गखोल्या उभारण्याची मंजुरी असूनही आठ खोल्यांच्या प्रस्तावावर मतभेद स्पष्टपणे पहायला मिळत आहेत. काही सदस्य बारा खोल्यांवर ठाम राहतात, तर काही आठ खोल्यांवर. या मतभेदामुळे समितीतील निर्णय प्रक्रियेवर परिणाम होत आहे. शाळेच्या विकासकामांचा वेग आणि पारदर्शकता यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. परिणामी, आठ आणि बारा वर्गखोल्यांच्या मुद्द्यावर समितीतील मतभेद गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनत चाललेला दिसुन येत आहे.
ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांकडून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
मंजूर बारा वर्गखोल्यांऐवजी आठ खोल्यांचे टेंडर काढण्यामागे कनिष्ठ अभियंत्याचे म्हणणे, निधी अपुरा पडेल, असे कारण असले तरी, ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांकडून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शाळेचे माजी विद्यार्थी अमोल कांबळे यांनी ठाम भूमिका घेत, “बारा मंजूर खोल्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही; अन्यथा शाळेसमोर आंदोलन उभे करू” असा इशारा दिला आहे.
पालकांचे म्हणणे काय?
काही पालकांचे म्हणणे आहे की, जर आत्ताच शाळेला बारा वर्गखोल्या मिळाल्या, तर सर्व विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळेल; आठ खोल्यांमध्ये ही सोय अपुरी पडेल आणि भविष्यात हीच समस्या पुन्हा उभी राहण्याची शक्यता आहे. पालकांनी यावर भर देत एकदाच बारा वर्गखोल्या मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, आणि कोणीही मलिदा न खाता, गरीब मुलांच्या शिक्षणाच्या भवितव्याचा विचार करून सुंदर, सक्षम इमारत उभी करण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
संपूर्ण गावकऱ्यांमध्ये आठ खोल्यांच्या प्रस्तावावर असंतोषाचे सूर वाढत असून, गावातील पालक, तरुण आणि माजी विद्यार्थी बारा खोल्यांच्या मुद्द्यावर एकवटत असल्याचे दृश्य स्पष्ट होत आहे. आगामी बैठकीत हा तिढा सुटतो का, शाळेच्या विकासकामांना गती मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







