Crime : जळगाव जिल्ह्यातील Padmalaya Forest परिसरात ४ फेब्रुवारी रोजी सापडलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले असून आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

काय घडले होते?
४ फेब्रुवारीला पद्मालयच्या जंगलात एक अज्ञात, अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. चेहरा आणि छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्यात आला होता, जेणेकरून ओळख पटू नये. जंगल परिसर, मोबाईल नेटवर्क नसणे आणि साक्षीदारांचा अभाव यामुळे तपास अधिकच गुंतागुंतीचा झाला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी मृतदेहावरील सूक्ष्म बाबींची नोंद घेतली. पायांच्या नखांवर ‘मॅजेंटा’ रंगाची नेलपेंट आणि नाकात सोन्याची मुरनी (मोरनी) असल्याचे दिसून आले. फॉरेन्सिक अहवालानुसार मृत्यू ३० किंवा ३१ जानेवारीला झाला असावा, असे स्पष्ट झाले. या धाग्यांवरून बेपत्ता व्यक्तींची यादी तपासण्यात आली.
ओळख आणि आरोपीपर्यंत पोहोच
तपासातून मृत व्यक्तीची ओळख आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे अशी पटली. ती तृतीयपंथी असल्याची माहिती समोर आली. पुढील तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची संशयाची सुई पहूर येथील स्वप्नील उर्फ गोलू अशोक पाटील (वय २१) याच्याकडे वळली.
चौकशीत स्वप्नीलने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्या कबुलीनुसार, त्यांची ओळख पाणीपुरीच्या गाडीवर झाली होती आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र आकांक्षा तृतीयपंथी असल्याचे समजल्यानंतर आणि लग्नासाठी दबाव टाकत असल्यामुळे त्याने रागाच्या भरात हा टोकाचा निर्णय घेतला. फिरायला नेण्याच्या बहाण्याने पद्मालय येथे नेऊन जंगलात तिची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला.
या प्रकरणात थेट पुरावे नसतानाही पोलिसांनी फॉरेन्सिक विश्लेषण, सूक्ष्म निरीक्षण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणला. मृतदेहाची ओळख पटवताना नेलपेंट आणि नाकातील दागिना हेच निर्णायक धागे ठरले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







