पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आता अवघे काही तास उरले आहेत. मात्र, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून नदीवरील चारही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

नदीकाठच्या अनेक बाजारपेठा आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानले जाणारे इंद्रायणी नदीवरील स्नान सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरते थांबवण्यात आले आहे. कुठलीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफचे पथक आळंदीत तैनात करण्यात आले असून पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून हजारो वारकरी आळंदीच्या दिशेने येत आहेत. परंतु, येथील गंभीर परिस्थिती पाहता राज्य सरकार आणि संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टने भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे काही भाविकांमध्ये नाराजी असली, तरी बहुतांश वारकऱ्यांनी सुरक्षिततेला महत्त्व देत या आवाहनाचे स्वागत केले आहे.
पूर परिस्थितीवर स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग बारीक लक्ष ठेवून आहे. नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
भाविकांनी आणि नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ सरकारी आणि अधिकृत सूचनांचेच पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



