अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील को-हाळे शिवारामध्ये एक हृदय पिळवून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर ३० वर्षीय अरुण काळे या तरुणाने स्वतःचे जीवन संपविताना आपल्या चार चिमुकल्या मुलांनाही मृत्यूला सामोरे जावे लागले. पत्नी माहेरी गेल्यामुळे सततच्या वादातून नैराश्यग्रस्त झालेल्या पित्याने ही थरारक पावले उचलल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, को-हाळे शिवारातील विहिरीत एका व्यक्तीचा तसेच लहान मुलांचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत अरुण काळे यांचा मृतदेह आढळून आला. चौकशीदरम्यान हे स्पष्ट झाले की अरुण काळे यांनी स्वतःचे जीवन संपविताना आपल्या चार मुलांनाही विहिरीत ढकलले.
शिवानी अरुण काळे (८), प्रेम अरुण काळे (७), वीर अरुण काळे (६) आणि कबीर अरुण काळे (५) अशी या निरागस मुलांची नावे असून, त्यांचे मृतदेह शाळेच्या गणवेशातच विहिरीत आढळले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अरुण काळे हे मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथील रहिवासी होते. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबात सतत किरकोळ कारणांवरून वाद होत होते. आठ दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी माहेरी, येवला येथे निघून गेल्या होत्या. पत्नी नांदायला येत नाही, या कारणावरून अरुण काळे यांच्यात प्रचंड नाराजी आणि नैराश्य निर्माण झाले. अखेरीस या मानसिक तणावातूनच त्यांनी आपल्या चार चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली.
विहिरीत मृतदेह आढळल्याचे समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पित्याने केलेल्या या पावलामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. या घटनेमुळे को-हाळे शिवार, राहाता तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
चिमुकल्यांचे जीवन इतक्या क्रूर पद्धतीने संपविल्याने स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि ग्रामस्थांना धक्का बसला आहे. अजूनही या घटनेचे नेमके मानसिक कारण समोर आलेले नसले, तरी कौटुंबिक वाद आणि तणावामुळेच हे टोकाचे पाऊल उचलले गेले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. अरुण काळे यांचे हातपाय बांधलेले असल्याने त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःला अशा अवस्थेत ठेवले का, की यामागे इतर काही कारण आहे, याचा तपासही सुरू आहे. तरीही प्राथमिक तपासातून हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे.







