Crime : बीडमधून समोर आलेल्या एका प्रकरणाने परिसरात खळबळ उडवली आहे. 21 वर्षीय विवाहित तरुणीला एका महिन्याच्या आत तीन वेळा जबरदस्तीने लग्न लावले गेले. या अमानुष त्रासामुळे पीडितेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, मानवी तस्करीचा रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

माहितीनुसार, लातूरची रहिवासी ही तरुणी दोन वर्षांपूर्वी बीडमध्ये एका तरुणाशी लग्न करून आलेली होती. मात्र तिच्या पतीचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. मानसिक आणि सामाजिक आधार गमावल्यामुळे पीडित तरुणी माहेरी राहण्यासाठी गेली. या दरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं तिला पुण्यात एका एजंटकडे पाठवले, “तुझे दुसरे लग्न लावून देतो,” असे आमिष दाखवून.
पीडितेच्या तक्रारीनुसार, एजंटने तिला बाजारात मांडल्यासारखे वागवले. पुण्यातील कात्रजमध्ये एका व्यक्तीकडून 5 लाख रुपये घेऊन जबरदस्तीने लग्न लावले. 10 दिवस राहिल्यानंतर तिला कुरुक्षेत्र येथे 4.5 लाख रुपये घेऊन दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवले. त्यानंतर तुळजापूरमधून कानडी बुद्रुक येथील तिसऱ्या व्यक्तीकडे साडेचार लाख रुपये घेऊन तिसरे लग्न केले गेले.
एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही; एजंटने चौथं लग्न लावण्याचा फोन करून पीडितेला आणखी मानसिक त्रास दिला. अखेर मानसिक छळ आणि सततच्या जबरदस्तीला कंटाळून तरुणीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला आष्टी तालुक्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.







