सागर जगदाळे

भिगवण: उजनी धरण (Ujine Dam) कार्यक्षेत्रातील भीमा नदीच्या पात्रालगत बेकायदेशीरपणे मांगुर मासे पालनाचा घाणेरडा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काही परप्रांतीय व्यापारी आणि स्थानिकांनी मिळून नदीपात्राच्या काही भागावर अतिक्रमण करून कृत्रिम तळी उभारली आहेत. या तळ्यांमध्ये मांगुर माशांच्या खाद्यासाठी चिकन सेंटरमधून आणलेली कोंबड्यांची आतडी, कातडी आणि कुजलेले मांसाचे अवशेष टाकले जातात. काही दिवसांनी या कुजणाऱ्या घाणीतून तयार झालेले दूषित पाणी थेट भीमा नदीत सोडले जाते, ज्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून पात्रातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सिंचनासाठी हेच पाणी वापरल्याने पिकांवर आणि मानवांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे.
या तळ्यांमधील मांगुर मासे छुप्या पद्धतीने बाहेर पाठवले जातात. रात्रीच्या वेळी ट्रक, पिकअप आणि खासगी फ्रिज व्हॅनद्वारे हे मासे इतर जिल्ह्यांमध्ये गुपचूप पाठवले जातात. काही ठिकाणी इतर मालाच्या आडून हे मासे पाठवले जातात, ज्यामुळे प्रशासनालाही त्याचा सुगावा लागत नाही. त्यामुळे उजनी परिसरातील हे बेकायदेशीर मांगुर पालन आता संपूर्ण प्रदेशात पसरलेला काळाबाजार बनला आहे.
ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या तरी अधिकारी बराच काळ गप्प बसले होते. अखेर जलसंपदा विभागाने या प्रकाराची दखल घेतली असून इंदापूर उपविभागीय अधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले की, “उजनी धरण हद्दीतील बेकायदेशीर मांगुर तळी हटवण्यासाठी आदेश दिले आहेत. लवकरच अतिक्रमणावर कारवाई केली जाईल.”
मात्र लोकांच्या मनात आता प्रश्न आहे. फक्त इशारा दिला आहे कि प्रत्यक्षात काम केला जाईल ? कारण याआधीही अनेक वेळा कारवाईच्या घोषणा झाल्या, पण काही दिवसांतच “मोठ्या नेत्यांचा फोन आला आणि फाईल बंद पडली” अशी कहाणी पुन्हा ऐकू येऊ शकते. त्यामुळे या वेळी प्रशासनाचा इशारा खरंच नदी स्वच्छतेसाठी ठोस ठरणार की पुन्हा एकदा राजकीय दबावाला बळी पडणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रामस्थांचे मत स्पष्ट आहे कि, “पत्रं नव्हे, कृती हवी; भिमा वाचवायची असेल तर दबाव झुगारून कारवाई करा.”
आता सगळ्यांचे लक्ष या कारवाईकडे लागले असून उजनीतील बेकायदेशीर तळी खरंच हटतील का? की पुन्हा एकदा नदी वाचवण्याचा इशारा पाण्यातच विरून जाईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







