Ashok Kharat Case : नागपूर : सध्या संपूर्ण राज्याचे राजकारण अशोक खरात प्रकरणामुळे चांगलेच तापले असून यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात अत्यंत खळबळजनक आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. खरात याने अनेक बड्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खाजगी आयुष्याशी संबंधित बाबींचा गैरवापर केल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत खालच्या पातळीवरचे आणि राज्याची प्रतिमा मलिन करणारे आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना केली. इतके गंभीर विषय समोर येत असतानाही सत्ताधारी पक्ष यावर गप्प का आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून राज्यकर्त्यांना या गोष्टीची थोडीही लाज वाटत नाही का, असेही ते म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच या प्रकरणात अनेक आमदार आणि आयएएस तसेच आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला होता. या सर्वांची नावे कोड वर्डमध्ये नोंदवली गेली असून या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारच्या कृत्यात सामील असतील तर ही बाब लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा केली आहे.
दुसरीकडे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर किंवा त्यांच्या कुटुंबावर अशा प्रकारे जाहीरपणे आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा आरोपांमुळे अधिकाऱ्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसतो आणि त्यांच्या कौटुंबिक संबंधांवरही विपरीत परिणाम होतो, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. प्रशासकीय यंत्रणा आपले काम चोखपणे करत असून चौकशीमध्ये ज्यांची नावे समोर येतील त्यांना नक्कीच बोलावले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांना सल्ला दिला आहे की, जर त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित काही ठोस पुरावे किंवा गोपनीय माहिती असेल, तर त्यांनी ती सार्वजनिकरीत्या मांडण्याऐवजी थेट मुख्यमंत्री किंवा महसूल विभागाकडे सोपवावी. पुराव्याशिवाय आरोप करून तपासात अडथळा आणू नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. सध्या हे प्रकरण राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले असून आगामी काळात या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






