Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची ठरलेली लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता काही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक महिलांच्या खात्यात पैसे न आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यभरात सुमारे 71 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारने या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, तरीही अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. काही महिलांनी प्रक्रिया केली असली तरी त्यांच्या अर्जात तांत्रिक चुका आढळल्या. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, मोबाईल नंबर जोडलेला नसणे किंवा अर्जातील माहितीमध्ये फरक असणे, ही मुख्य कारणे समोर आली आहेत. त्यामुळे या सर्व महिलांना तात्पुरते योजनेतून वगळण्यात आले आहे.
या महिलांना अर्ज दुरुस्त करण्यासाठी आणि ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आज या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. आजनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही आपली माहिती अपडेट केलेली नाही, त्यांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.
दरम्यान, पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत. ज्यांना हा हप्ता मिळाला नाही, त्यांनी आपली माहिती तपासून घ्यावी. जवळच्या सेतू केंद्रात जाऊन किंवा मोबाईल अॅपद्वारे ई-केवायसी पुन्हा तपासणे गरजेचे आहे. अन्यथा, पुढील हप्ते मिळणे थांबू शकते.







