Uruli kanchan : कधी निसर्गाचा लहरीपणा, तर बाजारभावाचा अस्थिरपणा जणू बळीराजाच्या पाचवीलाच पुजलेला आहे. यंदाच्या वर्षी अशीच काहीशी प्रचिती वळीराजाला आली आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर बाजारपेठेत तेजी येण्याऐवजी कोथिंबीर आणि कांद्याचे भाव रसातळाला गेल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

कोथिंबिरीला अवघा एक रुपया बाजारभाव मिळत असून, अनेक ठिकाणी व्यापारी फुकटदेखील माल घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे पदरचा खर्चही निघत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी कोथिंबिरीच्या उभ्या पिकात बकरी आणि मेंढ्या सोडण्याची अत्यंत वाईट वेळ आली आहे. बाजारात मालाची आवक भरपूर असतानाच दुसरीकडे गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांनी आपले हात आखडते घेतले आहेत.
इंधन टंचाईमुळे हॉटेलमधील मागणी घटल्याचा थेट परिणाम कोथिंबीर आणि इतर पालेभाज्यांच्या विक्रीवर झाला आहे. हॉटेल चालक माल उचलत नसल्याने व्यापाऱ्यांनीही खरेदी बंद केली आहे, परिणामी शेतकऱ्यांचा शेकडो टन माल शेतातच सडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
केवळ कोथिंबीरच नाही, तर कांदा उत्पादक शेतकरीही मेटाकुटीला आला आहे. कांद्याला मिळणारा भाव आणि काढणीसाठी लागणारा मजुरीचा खर्च याचा मेळ बसत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बी-बियाणे, खते, औषध फवारणी आणि मजुरी असा एकरी हजारो रुपये खर्च करूनही हातात छदामही पडत नसल्याने बळीराजा हताश झाला आहे.
“रात्रंदिवस कष्ट करून पीक उभे केले, पण आता त्याला कोणी वाली उरला नाही. बाजारात नेण्याचा वाहतूक खर्चही खिशातून द्यावा लागत असेल, तर माल विकायचा कोणाला?” असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. कोथिंबिरीची काढणी करण्यापेक्षा ती जनावरांना चारणे किंवा शेतातच नांगरणे शेतकऱ्याला सोयीचे वाटू लागले आहे, यातच या भीषण परिस्थितीचे गांभीर्य दडलेले आहे.
व्यापाऱ्यांची पाठ अन् गॅस टंचाईचा फटका
बाजारपेठेत कोथिंबिरीला उठाव नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी माल खरेदी करण्यास नकार दिला आहे. कोथिंबीर काढायला मजूर लावला तर मजुरीचे पैसेही निघत नाहीत, मग विकायची कोणाला?” असा उद्विग्न सवाल शेतकरी विचारत आहेत. त्यातच सध्या जाणवत असलेल्या गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांनी आपली मागणी निम्म्यावर आणली आहे. हॉटेलमधून मागणी घटल्याने पालेभाज्यांचे मार्केट कोसळले असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
30 हजारांचा खर्च अन् 1 रुपयांचा भाव!
सचिन महाडिक यांनी मोठ्या आशेने आपल्या दीड एकर क्षेत्रात कोथिंबीर लागवड केली होती. बियाणे, पेरणी, महागडी औषधांची फवारणी आणि मजुरी असा एकूण 30 हजार रुपयांचा खर्च त्यांनी या पिकावर केला. पीक काढणीला आले तेव्हा बाजारात कोथिंबिरीला केवळ 1 रुपया असा निचांकी भाव मिळू लागला.
“बाजारभावाचा काहीच भरवसा राहिला नाही. 30 हजार खर्च करून हाताशी आलेल्या पिकाला आता काढायलाही परवडत नाही. पीक कसं पिकवायचं हे आमच्या हातात आहे, पण त्याला भाव मिळणं आमच्या नशिबात नाही.”
सचिन विठ्ठल महाडिक, प्रगतशील शेतकरी, शिंदवणे, ता. हवेली






