Pune News : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला असताना, तो मार्गी लावण्यासाठी आता नवा पर्याय पुढे आला आहे. नाशिक ते शिर्डी अशी नवीन रेल्वे मार्गिका टाकून, ती पुढे चाकण औद्योगिक वसाहत आणि नव्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला जोडावी, असा तोडगा काही खासदारांनी थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडला आहे.

या नव्या प्रस्तावामुळे पुणे ते नाशिक असा पूर्णपणे नवीन रेल्वेमार्ग बांधण्याचा वेळ आणि खर्च वाचू शकतो, असा दावा खासदारांकडून करण्यात येत आहे. मात्र, या पर्यायालाही पुणे जिल्ह्यातून विरोध होण्याची शक्यता असल्याने हा प्रकल्प पुन्हा रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळाने तयार केलेले पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे मूळ संरेखन रद्द करून साईनगर शिर्डी-नाशिक असा मार्ग निश्चित करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच केली. यानंतर लगेचच या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत या बदलाला विरोध दर्शवला.
राज्यातील विविध पक्षांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वेमार्गाच्या संरेखनाचा फेरविचार करण्याची मागणी केली. या वेळी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, अशीही जोरदार मागणी करण्यात आली. शिवसेना (उबाठा) गटाचे गटनेते अरविंद सावंत, अनिल देसाई, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. अमोल कोल्हे, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे यांच्यासह अनेक खासदारांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
दरम्यान, नाशिक–पुणे रेल्वे मार्ग सिन्नर–संगमनेर मार्गेच व्हावा, या मागणीसाठी सिन्नरमध्ये सर्वपक्षीय सहविचार सभा घेण्यात आली. हा मार्ग डावलण्याचा प्रयत्न झाला, तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. बुधवारी (दि. १७) झालेल्या या बैठकीत मूळ प्रस्तावित मार्ग सिन्नर–संगमनेरमार्गेच होता आणि त्यासाठी जमीन संपादनही झाले होते, हे उपस्थितांनी स्पष्ट केले.
काही मोजक्या घटकांच्या फायद्यासाठी हा मार्ग पुणतांबा-शिर्डीमार्गे वळवण्यात आल्याचा आरोप करत, या बदलामुळे सिन्नर तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पावरचे वाद अजूनही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.





