प्रतिनिधी अमित मुंडीक

पुणे: पुणे (Pune News) शहरात एक खळबळजनक आणि गंभीर प्रकार समोर आला असून, पार्थ अजित पवार यांच्या नावाने बनावट पत्रे तयार करून त्यावर खोट्या सह्या केल्याचा आरोप झाला आहे. ही कथित पत्रे काही शासकीय अधिकाऱ्यांना पाठविल्याचे भासवत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात येत आहेत. या प्रकरणी पार्थ अजित पवार यांनी पुणे शहराच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे अधिकृत लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी विविध इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियामध्ये काही कथित पत्रे प्रसिद्ध झाली. ही पत्रे काही शासकीय अधिकाऱ्यांना संबोधित असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, पार्थ पवार यांनी या सर्व आरोपांचे स्पष्ट शब्दांत खंडन केले आहे. “मी अशा कोणत्याही पत्रांवर थेट किंवा अप्रत्यक्षपणे स्वाक्षरी केलेली नाही. अशा पत्रांच्या अस्तित्वाबाबत मला कोणतेही ज्ञान नाही,” असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
पार्थ पवार यांनी मीडियामधील या पत्रांचा अभ्यास केल्यानंतर प्रथमदर्शनी एक महत्त्वाची बाब निदर्शनास आणली आहे. या कथित पत्रांवर संबंधित कोणत्याही शासकीय विभागाची अधिकृत पोहोच पावती किंवा ‘अॅकनॉलेजमेंट’ आढळून येत नाही. त्यामुळे ही पत्रे बनावट व खोटी असल्याचा संशय अधिक बळावतो.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, काही समाजविघातक व असामाजिक घटकांच्या सांगण्यावरून, गुन्हेगारी हेतूने खोडसाळ व बनावट कागदपत्रे तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप पार्थ पवार यांनी केला आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, सत्य काय आहे हे तपासणे तसेच सखोल चौकशी करणे हे आर्थिक गुन्हे शाखेचे कर्तव्य असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चौकशीतून या कथित पत्रांचा मूळ स्रोत कोणता आहे? ती कोणी तयार केली ? पार्थ पवार यांच्या बनावट सह्या कोणी केल्या,? हे उघड होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, ही खोटी माहिती २४ तास सातत्याने इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून, ती प्रमुख मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, त्याचा समाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस दलाच्या सायबर क्राईम युनिटकडूनही स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी पार्थ पवार यांनी केली आहे. बनावट पत्रे ऑनलाइन कशी आणि कुठून प्रसारित झाली, याचा डिजिटल ट्रेल तपासून दोषींना शोधून काढावे, असे त्यांनी नमूद केले आहे.
पार्थ पवार यांनी आपल्या तक्रारीत हा दखलपात्र गुन्हा असल्याचे नमूद करत, सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या ऐतिहासिक निर्णयाचा हवाला दिला आहे. या निर्णयानुसार, दखलपात्र गुन्हा उघड होताच तात्काळ एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने त्वरित एफआयआर दाखल करून सखोल तपास करावा आणि बनावट पत्रे तयार करणाऱ्या व प्रसारित करणाऱ्या सर्व दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे पुणे शहराच्या राजकीय व व्यावसायिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम युनिट या तक्रारीवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






