लोणी काळभोर, ता. 20 : लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात (Loni Kalbhor News) राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवाराचे तिकीट जाहीर केले नसल्याने उमेदवारीसाठी अनिता गवळी, शीतल कांबळे व पूनम गायकवाड यांच्यात (Pune News) जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. तिन्ही उमेदवारांकडून तिकिटासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे. (Latest Marathi News)

दुसरीकडे, भाजपकडून मात्र अद्याप या गटासाठी कोणत्याही उमेदवाराचे नाव अधिकृतरीत्या समोर आलेले नाही. पक्षाकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा असली तरी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे मतदारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परंतु, या गटातून सुद्धा पूनम गायकवाड निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तर लोणी काळभोर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी पक्षाकडून रेश्मा युवराज काळभोर यांना तिकीट मिळणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. तर कदमवाकवस्ती पंचायत समिती गणातून भाजप व राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची सरबत्ती लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिता गवळी, शीतल कांबळे, पूनम गायकवाड व सिंपल कांबळे या इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्येही या तीन नावांबाबत चर्चा रंगू लागल्या असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
अनिता गवळी या गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून विविध विकासकामांमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे. तर शीतल कांबळे यांनीही स्थानिक पातळीवर आपला जनसंपर्क भक्कम केला असून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. तर पूनम गायकवाड व सिंपल कांबळे यांनीही प्रचाराचा धुमधडाका सुरु केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून नेमकी कोणाला संधी मिळणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
हवेली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कदमवाकवस्ती गणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. या गणातून अमोल टेकाळे, भरत मिसाळ, अक्षय म्हस्के, विजय दाभाडे, प्रकाश भिसे आणि राहुल जोगदंड हे सहा जण इच्छुक असल्याने पक्ष नेतृत्वासमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तर भाजपकडून नुकुल शिंदे, राकेश लोंढे, भगवान साळवे व ज्ञानेश्वर नामुगाडे हे इच्छुक उमेदवार आहेत. मात्र दोन्ही पक्षांनी कोणताही अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही.
लोणी काळभोर गणातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेश्मा काळभोर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांच्या नावावर पक्षांतर्गत एकमत होत असल्याची चर्चा असून कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण दिसत आहे. स्थानिक प्रश्नांची जाण आणि मजबूत जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे. विविध पक्षांमध्ये सध्यातरी उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत चालल्याने राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत आहेत.
दरम्यान, लोणी काळभोर जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. स्थानिक विकासाचे प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांवर यंदाची निवडणूक लढवली जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय हालचाली अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे. आगामी काळात उमेदवारांची अधिकृत घोषणा होताच प्रचाराचा धुरळा उडणार असून लोणी काळभोर गटातील निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार हे निश्चित आहे.
नाराज उमेदवार बंडखोरी करणार?
उमेदवारीसाठी वाढलेल्या स्पर्धेमुळे अनेक इच्छुकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तिकीट न मिळाल्यास काही नाराज उमेदवार बंडखोरी करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण आणखी ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पक्ष नाराज उमेदवारांची नाराजी दूर कशी करणार? हेही या निवडणुकीत महत्वाचे ठरणार आहे.







